खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प; आखात, स्पेनची कंपनी स्पर्धेत

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची गरज सातत्याने वाढत जाणार आहे. ही गरज भागवण्यासाठी मनोरी येथे मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी पालिकेच्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या प्रकल्पासाठी निविदापूर्व बैठकीला 21 कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. त्यात आखाती देशातील एक आणि स्पेनमधील एका पंपनीचा समावेश होता.

मुंबईला सात तलावांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार हा पुरवठा अपुरा पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी काही वर्षांनी दरदिवशी 6 हजार 426 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. नंतर दुसऱया टप्प्यात हीच क्षमता वाढवून 400 दशलक्ष लिटर पाणी यातून मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, 28 मेपासून सुरू झालेली निविदा प्रक्रिया 26 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

प्रकल्प रखडल्याने खर्च पोहोचला 4 हजार 400 कोटी रुपयांवर

या प्रकल्पांसाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नव्हता. याचा परिणाम थेट प्रकल्पाच्या खर्चावर झाला आहे. याआधीच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या वेळी या प्रकल्पासाठी 4 हजार 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प रखडल्याने त्याच्या मूळ किमतीत सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.