
दापोली तालुक्यात मे महिन्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वणंद येथील राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे सायकलसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वणंद येथील कांगणेवाडीत राहणारे राजेंद्र हे सकाळी कामावरून घरी परतत होते. माता रमाई स्मारकाजवळील कोंडी नदीच्या कॉजवेवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना ते वाहून गेले. ग्रामस्थांनी तातडीने तालुका आपत्ती व्यवस्थापनाला कळविल्याने तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, मुसळधार पाऊस आणि नदीकाठची झाडेझुडपे यांमुळे शोधकार्यात अडथळे आले. स्थानिकांनीही आटोकाट प्रयत्न केले, पण सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजेंद्र यांचा शोध लागला नाही. त्यांची सायकल कॉजवेखालील डोहात सापडली. दरम्यान, दापोलीत गेल्या 24 तासांत 237.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यातील हा अभूतपूर्व पाऊस ठरला आहे.