फडणवीसांची ‘ढिंच्याक’ डबल फास्ट, भाडे न वाढवता सर्वच लोकल एसी करण्याचा ‘विचार’ आहे!

मुंब्रा येथील लोकल दुर्घटनेत चार निष्पाप प्रवाशांचे बळी गेले. लोकल प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि रेल्वे प्रशासनाची उदासीनता या दुर्घटनेने चव्हाटय़ावर आणली. राज्य आणि केंद्र सरकारबद्दल लोकल प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वच स्तरांतून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे त्यावर बँडेज लावण्याची सरकारची धडपड सुरू झाली आहे. कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकल एसी करण्याचा विचार आहे, असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर मुंब्रा दुर्घटनेबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.

– मुंब्रा दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. त्यावेळी लोकल प्रवाशांच्या अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना सविस्तरपणे मांडल्या. मुंबईतील मेट्रो नेटवर्क पूर्ण न झाल्याने अजूनही लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठी आहे. त्यामुळे गाडय़ांची संख्या कशी वाढवता येईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईतील मेट्रो रेल्वे एसी आहेत, पण लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा प्रवाशीही काही दुय्यम नाही, त्यामुळे त्यांनाही एसी लोकल मिळावी असा सरकारचा आग्रह आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून कशी वाढवता येईल, यावरही सरकारचा भर राहील, असे ते म्हणाले.

खासगी कार्यालयांवर वेळ बदलण्यासाठी दडपण

लोकलची गर्दी विभागली जावी यासाठी कार्यालयीन वेळा पुढे-मागे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय कार्यालयांना तशा वेळा पूर्वीच देण्यात आल्या आहेत, खासगी कार्यालयांच्याही वेळा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते थोडे कठीण आहे. कारण खासगी कार्यालये त्यांच्या नफ्याचा विचार करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.