
ढोलताशांचा गजर…फटक्यांची आतषबाजी…लेझीमच्या तालावर नाचत गणेशभक्तांनी अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीबाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!,गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या जयघोषाने मांडवी परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्यात ३६ हजार ४०५ घरगुती गणेशमूर्ती आणि ६५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४२६ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गणपतीबाप्पाचे आगमन झाल्यावर त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजा-अर्चा व आरती करण्यात आली.बाप्पाला नमस्कार करून पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त घालत गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.विसर्जनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नगरपरिषदेकडून निर्माल्य गोळा करण्यात येत होते.