
मिंधे गटाच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागून एक बाहेर येत आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनलची जागा लाटल्याच्या प्रकरणापाठोपाठ पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱयांवर दबाव टाकून कोटय़वधी रुपयांचे आणखी तीन भूखंड कवडीमोल भावात लाटल्याचा नवा बॉम्ब गोळा एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तीयाज जलील यांनी टाकला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाणार
पालकमंत्री शिरसाट यांच्याकडे एवढा पैसा कोठून आला याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआय या यंत्रणा काय करीत आहेत? त्यांची सर्व प्रकरणे मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. मुख्यमंत्री यांनी चौकशी समिती नेमली पाहिजे. त्यानंतर राज्यपाल यांनाही सर्व पुरावे देणार आहे. त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा जलील यांनी दिला.
साजापुरात दहा एकर जमीन 1 कोटीत खरेदी
साजापूर येथे गट क्रमांक 8 मध्ये महार हाडोळा ही वर्ग-2 असलेली 10 एकर जमीन फक्त 1 कोटी 10 लाख रुपयांना लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून खरेदी केली. ही जमीन घेण्यासाठी 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार, तलाठी बागडे यांना मॅनेज करून ही जमीन पालकमंत्री शिरसाट यांनी मुलाच्या नावाने घेतल्याचा आरोप जलील यांनी केला.
चिंतामणी कॉलनीत 12 हजार चौरस फुटांचा भूखंड
अदालत रोडवरील चिंतामणी कॉलनी येथील 12 हजार चौरस फुटांचा भूखंड शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत, तुषार आणि पत्नी विजया यांच्या नावाने बिल्डर जबिंदा यांच्याकडून जानेवारी 2025 मध्ये अवघ्या 5 कोटी 83 लाख 94 हजार रुपयांमध्ये घेतला. येथे 15 ते 20 हजार चौरस फुटांचा दर असताना अवघ्या 4 हजार 800 रुपये दरात ही जमीन कशी मिळाली, असा सवाल जलील यांनी केला.
मुलगा सिद्धांतच्या नावे घेतलेल्या सहा एकर जमिनीत हॉटेलचे बांधकाम सुरू
डिसेंबर 2024 मध्ये साजापूर येथील गट क्रमांक 34 मध्ये 1 कोटी 50 लाख रुपयात 2 एकर जमीन पुत्र सिद्धांतच्या नावाने घेतली. अहेमद सिद्दीकी यांच्याकडून ही जमीन घेतली. याच गटातील प्रेमराज मंत्री यांच्याकडून फक्त 50 लाख रुपयात 2 एकर जमीन घेतली. एवढय़ा कमी दराने त्यांनाच कशा जमिनी मिळतात? याच गटात सप्टेंबर 2024 मध्ये वल्लभ बागला यांच्याकडून 2 एकर 16 गुंठे जमीन फक्त 60 लाखांमध्ये घेतली. या ठिकाणी भव्य हॉटेल बांधकाम सुरू आहे. या कामासाठी परिसरातून मोठय़ा प्रमाणात फुकटात मुरुम घेतला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला. शहरासह परिसरात एखादे रुग्णालय उभारायचे म्हटले तर जिल्हाधिकारी जागा देत नाहीत. मग नेत्यांना वर्ग-2 मधील जमिनी कशा दिल्या जातात, असा सवाल करीत जिल्हाधिकारी, पालकमंत्री शिरसाट यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हान जलील यांनी यावेळी दिले.