बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन

शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणाच्या समर्थनार्थ 15 जून रोजी धुळे-सोलापूर महामार्गावर शहागडच्या पैठण फाट्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सकाळी 10 वाजता होणार्‍या या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या वतीने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महायुतीने दिलेला शब्द प्रत्यक्षात आणावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 11 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ 15 जून रोजी सकाळी 10 वाजता शहागडच्या पैठण फाट्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.