
ठाकरे बंधुंच्या एकत्रित मोर्चाचा सरकारने धसका घेतला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि मराठी माणसाची एकजूट बघून सरकारला हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घ्यावा लागला, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणाचा कोणता निर्णय घेतला असेल तर तो महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय रद्द करणे हा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या. त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा, दबाव टाकण्याचा, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे तोडगे समोर आणले. पण शेवटी जनता रस्त्यावर उतरली आणि महाराष्ट्रभर सरकारी अध्यादेशाची होळी झाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसकाच घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि फडणवीस यांच्या सरकारला हिंदी सक्तीचा आदेश मागे घ्यावा लागला. आता याबाबत समिती स्थापन केली आहे. पण आम्ही त्रिभाषा सूत्र स्वीकारणाच नाही, मग समिती स्थापन करून मराठी माणसाला कशाला खेळवता? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि त्रिभाषा सूत्र धोरण महाराष्ट्र स्वीकारणार नाही हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही सांगितले आहे. दोन ठाकरे बंधुंनी याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावर उगाचच फडणवीस सरकारने फालतू खेळ करू नये, असा इशाराही राऊत यांनी दिला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे महाराष्ट्रासाठी फार मोठे आकर्षण होते. ताकद दाखवण्याचा हा मार्ग होता. त्यामुळे हा हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला हे मान्य केले पाहिजे. पाच जुलैच्या मोर्चाची तयारी सुरू झाली होती. राज ठाकरे यांनी आणि आम्हीही समन्वयासाठी दोन नेत्यांची नेमणूक केली होती. त्या दृष्टीने तयारी सुरू असताना सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. पण मोर्चाची तयारी दोन्ही बाजुने पूर्ण झालेली असून मराठी जो फोर्स तयार होणार होता त्याचे रुपांतर विजयी जल्लोषात करावे अशी भूमिका दोन्ही बाजुने आहे. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी काल बोलणे झाले असून ते आज त्यांचे मत व्यक्त करतील. हा मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या एकजुटीचा विजय आहे. मोर्चात जे जे घटक सामिल होणार होते त्यांच्यासह विजय मेळावा होईल. कुणालाही दूर ठेऊन, डावलून जल्लोष होणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
सक्ती हरली, मराठी शक्ती जिंकली; 5 जुलैला आता विजयी मोर्चा निघणार – उद्धव ठाकरे
मोर्चा एकत्र होणार होता आणि ठाकरे बंधुंची शक्ती बघून सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. दोन भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात मराठी ताकदीचा जो भूकंप होणार आहे, त्यामुळेच सरकारने ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे. हा मराठी एकजुटीचा विजय आहे. पाच तारखेला काय करायचे, कशा पद्धतीने विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्या संदर्भात आम्ही चर्चा करू, असेही राऊत म्हणाले.