
राजा रघुवंशी हत्याकांडमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अशातच राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत. आता मेघालय पोलिसांनी असाच एक खळबळजनक खुलासा केला आहे. यापूर्वी राजाची पत्नी सोनमने हत्येची कबुली दिली होती. आता सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनमच्या कुटुंबाला राजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी ते स्वीकारण्यास आणि दोघांना लग्न करण्यास परवानगी देण्यास नकार दिला. यासोबतच सोनमच्या कुटुंबाने तिचे लग्न राजा रघुवंशीसोबत ठरवले. त्यानंतर सोनमने तिच्या कुटुंबाला आधीच ताकीद की ती असे काही करेल ज्याचा परिणाम दोन्ही कुटुंबांवर होईल, असे तिने सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास अधीक तीव्र केला. यावेळी पीडितेच्या कुटुंबाची सोनम आणि राज दोघांचीही नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती. पीडितेच्या कुटुंबाची ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली आहे. एकीकडे त्यांच्याकडे आरोपींविरुद्ध आवश्यक असलेले सर्व पुरावे आहेत आणि दुसरीकडे नार्को-विश्लेषणाचे निकाल न्यायालयात ग्राह्य धरता येत नाहीत, त्यामुळे नार्को चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.
आरोपींनी आधीच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी आम्हाला हत्येबद्दल सर्व काही सांगितले आहे. त्यामुळे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, म्हणून आम्हाला नार्को चाचणी करणे गरजेचे वाटत नाहीए. सामान्यतः पुरावे नसताना नार्को चाचण्या केल्या जातात, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास केला जात आहे. केवळ कबुलीजबाबांवर अवलंबून न राहता ठोस पुरावे तयार करण्यावर भर दिला जात आहे. कायदेशीरदृष्ट्या योग्य आरोपपत्र लवकरात लवकर तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे .