लातूरात पुन्हा एकदा पूरस्थिती; रेणा, मांजरा, तावरजा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

लातूर जिल्ह्यात काल सायंकाळी पाऊस सुरू झाला. रात्रभर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. सर्व नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. रेणा, मांजरा व तावरजा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 29/10/2025 रोजी ठीक 5:00 वाजता रेणापूर प्रकल्पाचे एकूण 04 द्वार हे उघडण्यात आले असून रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 04 वक्र द्वारे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली असून एकूण 4987.53 क्युसेक्स (141.25 क्युमेक्स) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्पातून 1747.14 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

मांजरा प्रकल्पामधून आज पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 1747.14 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 29/10/2025 रोजी 07.00 वाजता गेट क्रमांक 1 व 6 ( हे 2 गेट) उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 2 वक्रद्वारे (क्र.1 व 6) 0.25 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात 1747.14 क्युसेक्स (49.48क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तावरजा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने दि. 28/10/2025 रोजी ठीक 23:15 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 02 द्वार हे उघडण्यात आले असून तावरजा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 02 ही उचल द्वारे 10 सेंटिमीटर ने उचलले असून एकूण 230 क्यूसेक्स (6.52 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. तावरजा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.