
छत्रपती संभाजीनगर शहराच्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे, पण छत्रपती संभाजीनगरवासीयांना पाणी कधी मिळणार, असा टोला लगावत दानवे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेत उपस्थित केला. एकेकाळी सनी देओलच्या चित्रपटात ‘तारीख पे तारीख’ हा संवाद गाजला होता, आज छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेची नेमकी तीच अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि अधिकाऱ्यांकडून फक्त तारीख पे तारीख दिली जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाणी कधी मिळणार? याचे उत्तर कोणाकडेच नाही, असा टोला दानवे यांनी लगावला. 1680 कोटींच्या या योजनेला 2001 साली कार्यादेश मिळाला. आज 2026 उजाडला तरी ही योजना पूर्ण झालेली नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
नगरविकास विभागामार्फत चौकशी करणार
नळपाणी 2009 साली ही योजना सुरू झाली त्यावेळी प्रकल्पाची किंमत 359 कोटी होती. चार वर्षांनंतर ही योजना 900 कोटी, त्यानंतर 1680 कोटींवर पोहोचली. प्रकल्प सुधारित केल्यावर ही योजना 2740 कोटींची झाली. या प्रकल्पाचे 83.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. दर 15 दिवसांनी या प्रकल्पाचा आढावा न्यायालय घेत आहे. योजनेच्या कामात काही ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याबद्दल जी तक्रार आहे याचा संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागामार्फत एका स्वतंत्र समितीची स्थापना केली जाईल. ही समिती दर पंधरा दिवसांनी आढावा घेईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
























































