
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 18 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर बंगळुरूमध्ये तुफान विजयोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या विजयोत्सवाला गालबोट लागले आणि बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी मैदानाजवळ चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जखमी झाले. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करत आरसीबीच्या मार्केटिंग हेडसह 4 जणांना अटक केली आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
बंगळुरूतील चेंगराचेंगरीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सकाळी मोठी कारवाई करत आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळे याला बंगळुरू विमानतळावरून अटक केली.
Bangalore Stampede चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना RCB करणार प्रत्येकी दहा लाखांची मदत
निखिल सोसाळे हा बंगळुरूहून मुंबईत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र कर्नाटक पोलिसांनी विमानतळावरूनच त्याला अटक केली. त्याच्यासह इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएचे सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत अशा तीन जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार
घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डीकुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. आयोग 30 दिवसांत अहवाल सादर करेल, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
हायकोर्टाने सरकारकडे अहवाल मागवला
चेंगरीचेंगरीबाबत प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वतःहून सुनावणी घेतली. प्राथमिक सुनावणीवेळी सरकारने घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व्ही. कमेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी. एम. जोशी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. खंडपीठाने सरकारला सविस्तर सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देत त्यासाठी 10 जूनपर्यंतची मुदत दिली. तसेच तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.
2.5 लाख लोकांची गर्दी उसळली; सरकारची माहिती
चेन्नास्वामी स्टेडियमजवळ तब्बल अडीच लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी उसळली होती. कमी जागेत झालेल्या या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, असा दावा करीत कर्नाटक सरकारने चेंगराचेंगरीचा प्राथमिक अहवाल उच्च न्यायालयापुढे सादर केला. तसेच दंडाधिकाऱयांमार्फत चेंगराचेंगरीची चौकशी केली जाईल, पुढील 15 दिवसांत घटनेमागील कारणे, त्रुटींचा उलगडा करण्याबरोबरच जबाबदारी निश्चित केली जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
तुमची मार्गदर्शक तत्वे काय आहेत?
जर भविष्यात अशा प्रकारची काही घटना घडली, तर तुमच्याकडे याबाबत मार्गदर्शक तत्वे काय आहेत? वाहनांची व्यवस्था केली आहे का? जखमींना कोणत्या रुग्णालयात नेले जाईल? या सर्व गोष्टींचा उलगडा एसओपीमध्ये केला पाहिजे, अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली.