
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. BCCI ने नुकतेच या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मात्र, वेळापत्रकाची घोषणा होताच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेतील एक सामना 14 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीला खेळवण्याची विनंती केली आहे.
अफगाणिस्तान या मालिकेचा यजमान असला, तरी तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. आधीच्या वेळापत्रकानुसार हे सामने 13, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार होते. मात्र, ITW युनिव्हर्सचे संस्थापक भैरव शांत यांनी एसीबीचे सीईओ नसिब खान यांना पत्र लिहून, मालिकेतील एक सामना 14 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आयोजित करण्याची विनंती केली आहे. ABP ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
गणेश चतुर्थी हा हिंदुस्थानातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक सण असल्यामुळे, या दिवशी सामना खेळवल्यास अफगाणिस्तान संघ हिंदुस्थानची संस्कृती आणि चाहत्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचा संदेश जाईल, असे ITW ने म्हटले आहे. हा एक अत्यंत स्तुत्य निर्णय ठरेल, ज्यामुळे बीसीसीआय आणि एसीबीमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.



























































