राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपवर सोडले आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजाकारणाला जनता उत्तर देणार आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताबदल होईल आणि महाविकास आघाडीचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
राज्यात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण असे अनेक प्रश्न असताना, भाजपकडून सुरू असलेल्या केवळ फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर सर्वात जास्त अस्वस्थता भाजपच्या आमदारांमध्ये असून, शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा असल्यानेही सरकारमधील धुसफूस उघड होत आहे, असेही देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना विचारात घेता, कायदेशीररीत्या शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच आहेत. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावादेखील देशमुख यांनी केला.