मुद्दा – पाऊस घाटमाथ्यावरच का रेंगाळलाय?

>> माणिकराव खुळे

यावेळी  मान्सून काळातील पाच मुख्य वातावरणीय प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अतिअनुकूल असूनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे, परंतु जो पडतो आहे तो मान्सुनी पावसाला साजेसा असा अधिक क्षेत्र व्यापकतेचा, दीर्घ कालावधीचा व एका संथ लयीतल्या पडणाऱ्या गुणधर्माचा जाणवत नाही. 20 जुलैपर्यंत अशी अवस्था राहिली तरी आश्चर्य वाटायला नको. 21 जुलैनंतरच्या म्हणजे 21 ते 27 जुलै या आठवडय़ात मान्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येऊ शकतो असे वाटते. तोपर्यंत ‘वाट बघा, लक्ष ठेवा’ या फेजमधून जावे लागेल असे वाटते.

महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असूनही जर अर्धा महिना (15 जुलैपर्यंत)अशीच अवस्था असणार असेल आणि उरलेल्या अर्ध्या महिन्याची सरासरी जर कोकण व पूर्व विदर्भातील 3 जिह्यांतील जोरदार पावसाने भरून निघणार असेल तर पाऊस वितरणाची ही असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. 21 ते 27 जुलैच्या आठवडय़ातील पावसावरच या सरासरीची भिस्त अवलंबून असेल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील (10+8+8)26 जिल्हय़ांत  चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी व पेर झालेल्या नाजूक रोपटय़ांसाठी पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. अजून या क्षेत्रात बऱ्याच पेरण्या बाकी आहेत. ज्या संयमी जाणकार शेतकऱ्यांनी राज्य कृषी खाते व केंद्रीय हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष दिले असेच शेतकरी दुबार पेरणी व वायफळ गुंतवणुकीपासून सुरक्षित आहेत. अर्थात महाराष्ट्रातील तुरळक काही ठिकाणी बियाणे उतरून पडेल इतपत पेरयोग्य पाऊस आजपावेतो झाला असेल अशा सर्व ठिकाणी पेर करण्यास हरकत नसावी असे वाटते. मात्र एकदम बाखर ओलीवर पेरणी मुळीच करू नये असेही नमूद करावेसे वाटते.

संपूर्ण देशात सध्या या आठवडय़ात सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे. मात्र फक्त कोकण व काहीसा विदर्भ (10 जिल्हे) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 26 व सीमांध्रातील रायलसीमा भागातील 8 जिह्यांसहित संपूर्ण तामीळनाडू व तेलंगणा राज्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातही मान्सून ट्रफ सरासरी जागेपेक्षा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे तसेच मॅडन ज्युलियन ऑसिलेशनही (एमजेओ) पुढील  2 आठवडे पावसासाठी पूरक जाणवत नाही.

पावसापासून मनुष्य व वित्तहानी होऊ नये  व प्रशासनाला कृती-कार्यवाही करता यावी म्हणून ह. खात्याकडून लाल ते पिवळ्या रंगापर्यंत पावसाच्या तीव्रतेनुसार लघू कालावधीचे (5 दिवसांचे) धोक्याचे इशारे (अलर्टस्)  दिले जातात, परंतु प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जर वातावरणात काही बदल झाल्यास ह. खात्याकडून  एका पायरीने चढ किंवा उतार करून सुधारणा केली जाते व तसे सूचित केले जाते. अंदाजाच्या अचूकतेकडे जाण्याचा हा प्रयत्न असतो.

’नोआ’ म्हणते 8 जूनलाच ‘एल निनो’ विकसित झाला तर  ‘आयएमडी’च्या अहवालानुसार सध्या ‘एन्सो’ न्यूट्रल अवस्थेत म्हणजे ‘एल-निनो’ नाही किंवा ‘ला-निना’ही नाही अशी न्यूट्रल स्थिती आहे व येणाऱ्या पावसाळ्यात ‘एल-निनो’ विकसित होणार आहे. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात पावसात घटही होऊ शकते. शिवाय  ‘आयओडीही’ ‘धन’  नाही किंवा ‘ऋण’ अवस्थेत नाही अशा न्यूट्रल स्थितीत आहे. म्हणजे मान्सूनच्या पावसासाठी घातक नसली तरी पूरकही स्थिती नाही. अशी   देशात वातावरणाची सद्यस्थिती आहे. एकंदरीत कितीही विधायक व सकारात्मक शक्यता मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत मांडल्या तरी ‘स्मरण असावे एल-निनोचे’ असेच सध्या म्हणावे लागेल, असे वाटते.

सध्याच्या वातावरणातील ही जटीलता एटमोस्फेरिक फिजिक्समधील ‘गतिक हवामानशास्त्र’ (डायनॅमिक मीटिओरोलॉजी) उपविषयातील हवामान घटकांची सूक्ष्म पातळीवरील गतिशीलतेवर आधारित आहे. सध्याचा वातावरणीय गुंतागुंतीचा खेळ हा त्याचाच परिणाम समजावा. सध्या एवढेच येथे मर्यादित विश्लेषण करून थांबावेसे वाटते.

खरे तर वैज्ञानिकांना हे एक आव्हानच वाटू लागले आहे आणि याच ठिकाणी  वैज्ञानिक हे आव्हान तर स्वीकारतीलच, पण पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणेही कसा गुंतागुंतीचा खेळ असतो  याचीही नोंद यानिमित्ताने जनसामान्यांच्या मनी असावी असे वाटते.

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ञ आहेत)