
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) वतीने मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेंगा या घोषवाक्याखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. फडणवीस सरकार विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनतेला फसवत आहे. दिशाभूल करणार्या घोषणा केल्या जात आहेत. मराठवाडा विकासाच्या दृष्टीने ठप्प झाला आहे. फडणवीस सरकार फक्त गाजर दाखवत आहे असा घणाघात आरोप करत शिवसेना नेते आ.अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले. यावेळी व्यासपीठावर आ.वैâलास पाटील, संपर्कप्रमुख परशुराम जाधव उपस्थित होते.
शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) वतीने १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यामध्ये जनआंदोलन करण्यात येत आहे. सरकारने केलेल्या विविध विकासांच्या घोषणांपैकी किती कामे सुरू झाली आणि किती कामे रखडली आहेत. याची वस्तुस्थिती हिशोब जनतेसमोर ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे ठिय्या आंदोलन झाले.
यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारवर घणाघात आरोप केले. सरकार फसवत आहे. जनतेची दिशाभूल करत आहे. मराठवाड्याचा विकास ठप्प झाला आहे. घोषणा करताना हजारो कोटी रूपयाच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. जनता होरपळून निघाली आहे. महागाईचा आगडोंब उसळत असतानाच आता दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. बीड जिल्हा भीषण दुष्काळाच्या वाटेवर आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. पिण्याचे पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून राबवलेली जलजीवन योजना गुत्तेदारांनी घशात घातली. एकही योजना पूर्ण झालेली नाही. त्याचे ऑडीट नाही, तपासणी नाही. पाठपुरावा नाही. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आता भटकंती सुरू होईल. सरकारचं लक्ष कुठं आहे, असा संतप्त सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
तत्पूर्वी आमदार कैलास पाटील यांनीही सरकारच्या धोरणांचा पंचनामा केला. एकीकडे कर्नाटक सरकारने केवळ २० टक्के पावसाची तुट असताना दुष्काळ जाहीर केला. महाराष्ट्रात पावसाची तुट कर्नाटकपेक्षा जास्त असताना फडणवीस सरकार कशाचे पंचांग पाहत आहे असा प्रश्नही उपस्थित केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, दिलीप घुगे, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, कुंडलिक खांडे, नितीन धांडे, महिला आघाडी जिल्हा संघटक मिराताई नवले, तालुकाप्रमुख विनायक मुळे, अजय दाभाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

























































