आता असह्य होत आहे! ताई दादांवर भडकल्या

चांदनी चौकाच्या नुतणीकरणाचे 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची पत्रके सध्या कोथरूड परिसरात वाटण्यात येत आहेत. या कार्यक्रमातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले आहे. आमंत्रण पत्रिकेत तसेच व्हॉट्सअॅपवरून पाठवलेल्या आमंत्रणात कुठेही त्यांचा उल्लेख नाहीए. मेधा कुलकर्णी यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली असून त्यातून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

”असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” अशी भावनिक सुरुवात त्यांनी त्या पोस्टची केली असून त्या सोबत त्यांनी आमंत्रण पत्रिकेचा फोटोही जोडला आहे. त्या फोटो नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांची मुख्य उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र मेधा कुलकर्णी यांनी आपल्या प्रयत्नांमुळे हे काम झाले असून आपले साधे नाव देखील आमंत्रण पत्रिकेत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ”माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?” अशी टीका त्यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे देखील पासेस मेधा कुलकर्णी यांना देण्यात आले नव्हते. याचा देखील उल्लेख त्यांनी या पोस्ट मध्ये केला आहे. ”मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.” अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.