व्हिडीओत दिसणारा हैवान सापडला

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या जमातींमध्ये संघर्ष सुरू असून मैतेई समाजाच्या जमावाने पोलिसांच्या तावडीतून कुकी जमातीच्या या महिलांना ओरबाडून घेत त्यांची नग्न धिंड काढली होती. यानंतर या दोघींवर अनेकांनी बलात्कार केले. या महिलांची धिंड काढली जात असताना एका महिलेला दोन जण पकडून नेत असतानाची दृश्ये चित्रीत करण्यात आली होती. हे दोघेजण चालत असताना त्यांच्या शरीराला किळसवाण्या पद्धतीने स्पर्श करत होते. यातला हिरव्या रिंगाचा टीशर्ट आणि लाल रंगाची हाफ चड्डी घातलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. हिरोदास मैतेई असं या या आरोपीचं नाव आहे.

हिरोदासचं पूर्ण नाव हुईरेम हिरोदास मैतेई असं आहे. त्याचं वय 32 वर्ष असून तो महिलांची धिंड काढणाऱ्या 800 ते 1000 लोकांच्या जमावाचा एक भाग होता. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड करण्यास सुरूवात केली असून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हिरोदासला अटक केली आहे. हिरोदासच्या बापाचं नाव ए.राजन मैतेई असून तो पेची अवांग लिकाई गावचा रहिवासी आहे. कुकी जमातीच्या महिलांवर करण्यात आलेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातील सगळ्या संशयितांची ओळख पटली असून त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, आणि यातल्या प्रमुख आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठीही प्रयत्न केले जातील असं आश्वासन मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

पोलिसांनीच जमावाच्या ताब्यात दिले

एका पिडित 40 वर्षीय महिलेने एका इंग्रजी वृत्तपत्राकडे कैफियत मांडताना अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. ‘जमावाने गावावर हल्ला केला तेव्हा आम्ही बचावासाठी जंगलाकडे पळालो. हल्ला झाला तेव्हा पोलिसही तेथे होते. पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले’, आपले वडिल आणि भावाचीही हत्या जमावाने केल्याचे या महिलेने म्हटले आहे.

4 मे 2023 रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबतचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपुरातील भाजप सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला आता जाग आली आहे. या थरकाप उडवणाऱया घटनेने अवघा देश हादरला असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. मणिपुरमध्ये आरक्षणाच्या मद्दय़ावरून 3 मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायात जातीय हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला. हजारो घरांची आगीत राखरांगोळी झाली. मणिपुरातील हिंसाचार रोखण्यात तेथील भाजपचे सरकार आणि केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे.