दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या 50 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले असून यात 48 मुले तर 2 मुली आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर केली. जाहीर केलेल्या यादीत गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात असल्याचे पहायला मिळत आहे.
यंदा मोठय़ा प्रमाणात आयटीआय प्रवेशासाठी अर्ज विद्यार्थ्यांनी केले आहेत. तब्बल 2 लाख 60 हजार 548 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 2 लाख 22 हजार 042 मुले तर 38 हजार 506 मुली आहेत. प्राथमिक गुणवत्ता यादीत समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांना यादीसंदर्भात हरकती व बदल करण्यासाठी उद्या 14 जुलै हा शेवटचा दिवस आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 16 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. तर पहिली प्रवेश फेरी व प्रवेश अॅलॉट 20 जुलै 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहेत. त्यानंतर पहिल्या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 21 ते 25 जुलै या काळात प्रवेश घ्यायचे आहेत.
100 टक्के गुण मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईसह, पुणे, नगर, अकोला, अमरावती आदी शहरातील मुलांचा समावेश आहे.