
मुंबईत सोमवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईसाठी ऑरेंज इशारा जारी करत पुढील काही तासांत जोरदार पावसाच्या सरी आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
#WATCH | Maharashtra | Rain lashes parts of Bandra East
Mumbai and surrounding areas are witnessing pre-monsoon showers with lightning and thunderstorms. The monsoon onset in Mumbai is expected later today or tomorrow. The IMD will announce the monsoon only when all parameters… pic.twitter.com/Q7xL5sTYJh
— ANI (@ANI) June 22, 2026
सकाळी 6 ते 7 या एका तासाच्या कालावधीत मुंबई शहर भागात सरासरी 17 मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगरांमध्ये 10 मिमी पाऊस झाला. याच कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये पावसाची नोंद झाली नाही.
शहर विभागात वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले महापालिका शाळेत सर्वाधिक 61 मिमी पावसाची नोंद झाली. जी/दक्षिण विभागात 58 मिमी पाऊस झाला. वरळीतील आदर्श नगर शाळा आणि मलबार हिल परिसरात प्रत्येकी 44 मिमी पाऊस पडला. वरळी फाउंटन येथे 42 मिमी, एफ/दक्षिण विभागात 41 मिमी, तर वरळी सी-फेस परिसरात 37 मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. पाली-चिंबई शाळा आणि सुपारी टँक महापालिका शाळा येथे अवघ्या एका तासात प्रत्येकी 70 मिमी पावसाची नोंद झाली. एच/पश्चिम विभाग कार्यालय परिसरात 30 मिमी, वांद्रे अग्निशमन केंद्रात 28 मिमी, तर बनाना लीफ आणि जुहू दवाखाना परिसरात प्रत्येकी 25 मिमी पाऊस झाला.
आयएमडीने सकाळी 7 वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट’ इशाऱ्यात पुढील तीन तास मुंबईत ऑरेंज इशारा लागू राहणार असल्याचे म्हटले आहे. “काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे,” असे हवामान विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरण लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः सखल भागात आणि प्रवासादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मान्सूनच्या विलंबामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


























































