
सध्या देशभरात E 20 पेट्रोलवरील चर्चा सातत्याने सुरू आहे. काहींच्या मते यामुळे इंधनाची बचत कमी होते, तर काही जण इंजिनच्या आयुर्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता हा वाद वाढत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक निवेदन जारी करून टीका करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आ 20 चा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
ई२० पेट्रोलमुळे एकाही वाहनाचे नुकसान झाल्याचे दाखवून द्या, तसेच वाहन कोणते आहे, कोणत्या कंपनीचे आहे, ते सांगा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच त्यांनी असाही दावा केला की ई२० विरोधात एक खोटी मोहीम चालवली जात आहे. त्यामुळे आता E20 पेट्रोलचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे.
अनेक वाहन चालकांचा असा दावा आहे की, २० टक्के इथेनॉल असलेल्या ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे आणि वाहनाच्या विविध भागांवर परिणाम होत आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, जर ई२० पेट्रोलमुळे कोणत्याही कार, बाईक किंवा स्कूटरमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल, तर आम्हाला फक्त एक उदाहरण दाखवून द्या.
देशात एकही असे प्रकरण नाही जिथे ई२० पेट्रोलमुळे गाडीत कोणतीही समस्या निर्माण झाली असेल. अशा प्रकरणाची माहिती असल्यास दाखवून द्यावे. ई२० पेट्रोलबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे आणि त्याविरोधात पैसे देऊन प्रचारमोहीम चालवली जात आहे, असेही ते म्हणाले.
देशात दरवर्षी अंदाजे २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतो आणि प्रदूषणही वाढते. देशाला हरित इंधन आणि इतर पर्यायी इंधनांचा अवलंब करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल, असे ते म्हणाले.
इथेनॉल उत्पादनात त्यांच्या कुटुंबांशी संबंधित कंपन्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांबाबत, गडकरी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने असले तरी, त्यांच्या कंपन्या इथेनॉल व्यवसायावर अवलंबून नाहीत. त्यांनी सांगितले की, ई२० ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे




























































