
राजधानी दिल्लीत आज जेन झी क्रांतीची मशाल पेटली. मोदी-शहांचा अहंकार पायदळी तुडवत त्यांच्या नाकावर टिच्चून हजारो तरुणांनी संसदेवर कूच केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी अडथळे उभे केले गेले. मेट्रो स्टेशन्स बंद केली. इंटरनेट सेवा थांबवली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अमानुषपणे आंदोलकांवर लाठीहल्ला केला. तरुणांची डोकी फोडली. विद्यार्थिनींचे कपडे फाडले. शेकडो तरुण जखमी झाले. मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही मोर्चा पुढे निघाला. या तडाख्याने मोदी सरकार हादरले असून आंदोलक संसदेत घुसतील या भीतीने संसदेचे मुख्य प्रवेशद्वार साखळदंड लावून बंद करण्यात आले, तर बंदुका रोखून जवानांना तैनात करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाचे लोण देशभर पसरले असून आज महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत तरुणांनी निदर्शने केली.
कॉक्रोच जनता पार्टीने आज संसदेवर मार्चाची हाक दिली होती. त्यासाठी रविवारपासूनच देशभरातून हजारो तरुण-तरुणी दिल्लीत दाखल झाले. सकाळी 10च्या सुमारास हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेतलेल्या हजारो तरुण-तरुणींनी जंतरमंतरवरून संसदेच्या दिशेने कूच केली. मात्र दिल्ली पोलीस, रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी हा मोर्चा रोखण्यासाठी ठिकठिकाणी मोठे बॅरिकेट्स लावले. मात्र आंदोलक तरुणांनी बॅरिकेट्स तोडले. पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेकांची डोकी फोडली. तरुण-तरुणी रक्तबंबाळ झाले. या दडपशाहीला न घाबरता आंदोलक तरुणांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. तरुणांचे कपडे फाडले. तरीही तरुणाई डगमगली नाही. काहीजण संसद परिसरातील झाडांवर चढले. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो’च्या घोषणा सुरू होत्या. दरम्यान, ‘सीजेपी’चे नेते अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी पसरली. मात्र दीपके यांना ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
देशातील तरुणाई संसदेच्या प्रवेशद्वाराबाहेर रक्तबंबाळ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार संसदेतच होते. तरुणाईचा आक्रोश त्यांच्या कानावर गेला नाही. सरकार शांत होते तर सत्ताधारी भाजपचे काही खासदार या आंदोलनाची चेष्टा करत होते.
वांगचुक यांच्या पत्नीला केस धरून खेचले
संसदेवरील मोर्चात सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो या पुढे होत्या. मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. पोलिसांनी गीतांजली यांनासुद्धा केसाला धरून खेचल्याचा अत्यंत गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. इतकेच नव्हे तर 12 वर्षांच्या मुलीसह 40 ते 50 जणांची डोकी फोडल्याचा दावाही करण्यात आला आहे.
जंतरमंतरवरील टेंट काढला, स्टेज हटवले
मोदी सरकारने पोलीस बळाच्या जोरावर जंतरमंतरवरील आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीपासूनच परिसराला पोलिसांनी वेढा घातला. मोठय़ा संख्येने आंदोलक गोळा झाल्यानंतर सकाळी 9.30 वाजता आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले. त्यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटविले असून परिसर रिकामा केला. याशिवाय तेथील टेंट, स्टेज काढून टाकण्यात आले.
नड्डा यांची भेट; पण ठोस आश्वासन नाहीच
‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि आपल्या तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नड्डा यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. योग्य स्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे नड्डा म्हणाल्याचे दास यांनी सांगितले. दास यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, नड्डा यांनी ‘सीजेपी’च्या प्रतिनिधींना भेटीसाठी आपल्या निवासस्थानी बोलावले. मात्र, दोन तास ताटकळत ठेवून 10 मिनिटेच चर्चा केली.
‘सीजेपी’च्या तीन प्रमुख मागण्या
‘सीजेपी’ने आपल्या तीन प्रमुख मागण्यंचे निवेदन मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे दिले. त्यात सोनम वांगचूक यांना तत्काळ सोडा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि नीट पेपरफुटी घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या, अशा या मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलन सुरूच राहणार
आम्ही तीन मागण्या सरकारकडे मांडल्या पण त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे रात्री उशिरा कॉक्रोच पार्टीने सांगितले. आम्ही जंतरमंतरवरच ठाण मांडून राहणार आहोत. यापुढे चर्चा करायची असेल तर सरकारने त्यांचा प्रतिनिधी येथे पाठवावा, असे अभिजीत दीपके यांनी सांगितले.
लाठीमारानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र
जेन-झीने संसदेवर काढलेल्या मोर्चावर निर्दयी लाठीमार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर टीकेचा भडीमार होत आहे. त्यानंतर दिल्लीत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची एक बैठक झाली. त्यात पीयूष गोयल आणि किरेन रिजिजू हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. याशिवाय केद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख यांचीही वेगळी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टाळ्या वाजवून निषेध
आंदोलक तरुणांवर दिवसा लाठीमार केल्यानंतर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी रात्री जंतर-मंतर परिसरातून लाँग मार्च काढला. त्यावेळी कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी टाळ्या वाजवून त्यांनी दिवसा केलेल्या कृतीचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला.
मोदींच्या दहशतीचे युग संपले – संजय राऊत
मोदींच्या दहशतीच्या युगाचा अस्त झालाय. देशाच्या तरुणांनी त्यांचे गर्वहरण केले आहे. त्यांच्या हुकूमशाहीला उघडे पाडले. संसदेबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले. अश्रुधूर, पाण्याचा मारा, निर्दयी लाठीमार आणि मोदी मीडियाचा प्रपोंगंडा सारेकाही अपयशी ठरले आहेत. मोदींची भीतीची मशीन पूर्णपणे मोडली आहे, अशी पोस्ट शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर केली.
उच्च न्यायालयाने मागितला वांगचुक यांच्या प्रकृतीचा अहवाल
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 28 जूनपासून सोनम वांगचुक हे जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी बळजबरीने उचलून नेले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांनी आजच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रुग्णालयातून सोडण्यात यावे, अशी विनंती रुग्णालय प्रशासनाला केली होती. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही. माझी तब्येत ठणठणीत आहे, असे त्यांनी त्यात म्हटले होते. दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मंगळवारी 21 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
अभिजित दीपके यांनी उपोषण सोडले
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपले उपोषण सोडले. सोनम वांगचुक यांना उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दीपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून अभिजित दीपके यांनी उपोषण सोडले. वांगचुक यांनी दीपके यांना उपोषण संपवून आंदोलन सुरू ठेवण्यासाठी आपली ऊर्जा वाचवण्याची विनंती केली होती, असे वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी यावेळी सांगितले.
उपोषण सुरूच ठेवणार
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱया तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही क्रूरता पाहिल्यानंतर मी माझे उपोषण सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार सोनम वांगचुक यांनी व्यक्त केला आहे. वांगचुक यांनी सफदरगंज रुग्णालयातून एक हस्तलिखित संदेश पाठवला असून, ‘एक्स’वर शेअर केला आहे. ‘जोपर्यंत तरुण नेत्यांना संसद भवनात भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला येथे रुग्णालयात खासदारांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही तापेर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे, असे वांगचुक यांनी नमूद केले.
विजेचा शॉक दिल्याचा आरोप
आंदोलकांना विजेचा शॉक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. अनेक आंदोलकांनी बॅरिकेड्सना हात लावल्यानंतर करंट बसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या, ‘आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. अनेक पोलीस साध्या वेशात आले होते. त्यांनी मुलांना बेदम मारहाण केली, अनेक मुलांचे कपडे फाडले, त्यांना इलेक्ट्रिक शॉकदेखील देण्यात आला. एवढे निर्दयी आणि अहंकारी सरकार या देशाने कधीच पाहिले नाही. निशस्त्र मुलांवर या सरकारने लाठय़ा चालवल्या आहेत.





























































