
”न्यायालयाला खेळ समजलात का?” हा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालय विचारत आहे. यावर खुद्द सुप्रीम कोर्टानेच चिंतन केले पाहिजे. सर्वच क्षेत्रांत गोंधळ निर्माण झाला आहे. चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीत उतरतात आणि देशाच्या गृहमंत्र्यांना तोच चोरीचा माल नजर करतात. सुप्रीम कोर्ट हा खेळ उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
“न्यायालयाला खेळ समजलात का?” असा सवाल सुप्रीम कोर्टाने देशातील तीन हास्य कलावंतांना विचारला तेव्हा न्याय नाकारलेल्या अनेकांना हसू फुटले आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या सर्वच स्तरांवरील न्यायालयांनी स्वत:चे हसे करून घेतले आहे. देशाचे सरन्यायाधीश त्यांच्या पन्नासेक सहकारी न्यायाधीशांसह ‘इंग्लंड’ दौरा करून आले व कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या सोबत ‘बॅडमिंटन’ खेळतानाचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा जनतेची खात्री पटली की, भारतीय न्याय व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता कितीही छाती पिटली, आदळआपट केली तरी गेलेली प्रतिष्ठा परत मिळणार नाही. गेल्या आठ दिवसांत देशाच्या सुप्रीम कोर्टात तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक महिला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या समोर आक्रोश करताना देशाने पाहिली. तिचे म्हणणे होते, “साहेब, माझ्या कौटुंबिक खटल्याचा निकाल द्या. सुप्रीम कोर्टाचे उंबरठे झिजवून मी मरायला टेकले. आता माझ्यात त्राण नाहीत. आजच सुनावणी घ्या. माझ्या घरात खायला अन्न नाही. मुलांचे हाल सुरू आहेत,” पण सरन्यायाधीशांचे मन द्रवले नाही. त्यांनी त्या महिलेच्या आक्रोशाला पुढची तारीख दिली. न्यायालयात अश्रू, मानवता यांना स्थान उरलेले नाही. त्याआधी शुक्रवारी एका याचिकाकर्त्याने सरन्यायाधीश सूर्य कांत यांना शिवीगाळ करून न्यायालयात कागदपत्रे भिरकावली, कामकाजात अडथळा आणला. तरीही न्यायमूर्तींनी त्या याचिकाकर्त्याविरुद्ध सहानुभूती दाखवली. न्यायालय म्हणाले, “ते खूप अस्वस्थ आहेत. हा त्यांचा उद्वेग आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल केवळ सहानुभूती आहे.” न्यायालयाचे हे वागणे दुटप्पीपणाचे आहे. एक महिला आक्रोश करीत सरन्यायाधीशांना खटला लवकर चालवण्याची विनवणी करीत राहिली, तिला कोणतीच सहानुभूती नाही, पण सर्वोच्च न्यायालयात उभे राहून न्यायाधीशांवर कागद भिरकावणाऱ्याला, सरन्यायाधीशांना शिव्या घालणाऱ्या व्यक्तीला मात्र सहानुभूती आहे!
आमची न्यायालये शिव्या खाण्याच्याच लायकीची झाली आहेत हे सत्य न्यायालयाने स्वीकारले आहे, असा या घटनांचा अर्थ समजावा काय?
झाड कोसळले
भारताचे न्यायदान विकले गेले आहे. न्याय हा केवळ कायद्याचा विषय नाही. तो माणुसकीचा, लोकशाहीचा आणि सत्याचा आत्मा आहे. न्यायालयाच्या बाजूने उभे राहणे म्हणजे भविष्याच्या बाजूने उभे राहणे हा विचार आता संपला आहे. भारतातील नैतिकतेचे झाड पूर्ण कोसळले आहे. त्या झाडाखाली भारतीय लोकशाहीचे सर्वच स्तंभ चिरडले आहेत. तसे नसते तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे हे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर उघडपणे फिरले नसते व त्याच चोरीच्या मालाचा नजराणा गृहमंत्री अमित शहा यांना पेश केला नसता. सोमवारी रात्री शिवसेनेतून फोडलेल्या सहा खासदारांचा चोरीचा माल घेऊन शिंदे अमित शहांच्या दरबारात हजर झाले व त्यांनी हा चोरीचा माल अमित शहांना पेश केला. चोरणारे व चोरीचा माल विकत घेणारे यांचे संगनमत राजकारणात झाले आहे आणि देशाची न्यायालये त्यावर गप्प बसली आहेत. या दोन विषयांवर ‘स्यू मोटो’ने लक्ष घालावे असे आमच्या सर्वोच्च न्यायालयाला वाटत नाही.
पहिले म्हणजे NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणात सोनम वांगचुक यांनी सुरू केलेले उपोषण. हा स्तंभ प्रसिद्ध होईल तेव्हा त्यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस असेल व त्यांची प्रकृती आताच पूर्ण खालावली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे दिल्लीत बसलेल्या सर्वोच्च न्यायालयाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते. देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वांगचुक यांचे उपोषण आहे. न्यायमूर्तींची मुलेही न्यायाधीश किंवा सरकारी वकील होतात. ती अशा कोणत्याच स्पर्धा परीक्षांना बसत नाहीत. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची झळ न्यायालयांतल्या परिवारांना बसत नाही. न्यायालयाने वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व सरकारला आदेश द्यावेत एवढे तरी करावे. दुसऱ्या महत्त्वाच्या विषयात सुप्रीम कोर्टाने लक्ष घालायला हवे ते म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरीचे. श्रीरामांच्या डोळ्यांसमोर दानपेट्या चोरल्या हा देशातील कोट्यवधी श्रद्धाळूंचा विश्वासघात आहे. गेल्या 15 वर्षांत श्रीरामांच्या नावावर हजारो कोटी रुपये गोळा केले गेले. त्याचा हिशेब नाही. संघ परिवाराच्या चंपत राय टोळीने अयोध्येतील अनेक मंदिरांचा ताबा घेतला व त्याचे व्यवहार कोट्यवधींना केले. ‘फकीरे राम मंदिर’ कसे विकले ते संतोष दुबे यांच्याकडून ऐकून घेतले पाहिजे. ज्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राममंदिर उभे राहिले, अडथळे दूर झाले, त्या राममंदिरातील दरोड्याची दखल ‘स्यू मोटो’ने घ्यावी असे कोर्टाला वाटले पाहिजे. श्रीरामांच्या कृपेने आज सरकार चालले तसे राम भरोसे न्यायालयही चालणार आहे. कायदा, घटनेने तर काहीच सुरू नाही. बेकायदेशीर वागणाऱ्यांना संरक्षण देणे हेच आता न्यायालयांचे काम उरले आहे. तसे नसते तर चोरीचा माल घेऊन शिंदे हे दिल्लीत उतरले नसते व देशाच्या गृहमंत्र्यांना भेटण्याची हिंमत केली नसती. मनमोहन सिंग हे मौनी बाबा असल्याची चेष्टा करत पंतप्रधान मोदी व त्यांचा भाजप सत्तेवर आला, पण जेव्हा देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, स्वाभिमान आणि संविधान संकटात आले, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग हे बोलले आहेत. त्याचे एक उदाहरण भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी दिले. कुरेशी यांनी सांगितल्यानुसार, उत्तर प्रदेशच्या 2012 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान तेव्हाचे कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत एक घोषणा केली होती. राज्यात सत्ता आल्यावर नोकरीत मुस्लिमांचे आरक्षण 4.5 टक्क्यांवरून 9 टक्के वाढवले जाईल असे खुर्शीद एका प्रचार सभेत म्हणाले. भाजपने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. हा आचार संहितेचा भंग आहे असे भाजपने सांगितले. आयोगाने चार दिवस या तक्रारीवर सुनावणी घेतली. अखेरीस आयोगाने सलमान खुर्शीद यांना फटकारले. आयोगाच्या या भूमिकेवर नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. (खुर्शीद यांनी मुस्लिम हिताचा मुद्दा मांडला, पण मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी हे स्वत: मुसलमान असूनही त्यांनी खुर्शीद यांना फटकारले.) निवडणूक आयोगावर टीका सुरू होताच मनमोहन सिंग यांनी कुरेशी यांना भेटीस बोलावले व म्हणाले, “आपल्यावरील टीकेमुळे मी व्यथित आहे. निवडणूक आयोग म्हणजे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आपण त्यालाच हरवून बसलो तर सगळेच हरवून बसेल.” मनमोहन सिंग संविधानिक संस्थांचा आदर करत होते. आजचा निवडणूक आयोग हा बहिऱ्या अवस्थेत आहे. मोदींचा अंधभक्त होऊन पडला आहे. बिहार, महाराष्ट्रासारख्या राज्यांत सरकारी पैशांचा वापर करून महिलांची मते विकत घेतली गेली. मतदानाच्या दिवसापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जात होते. याची तक्रार ना निवडणूक आयोगाने स्वीकारली ना सुप्रीम कोर्टाने. त्यामुळेच शिंद्यांसारखे लोक चोरीचा माल घेऊन गृहमंत्र्यांच्या घरात जात आहेत.
कुणाला काय?
वृत्तपत्र स्वातंत्र्य, पर्यावरण, भ्रष्टाचार यांबाबत भारताचा ‘इंडेक्स’ जागतिक पातळीवर कोसळला आहे. अर्थव्यवस्था मरण पावली आहे, पण भारतातील न्यायदानहीदेखील घसरणीस लागले आहे. सोनम वांगचुक यांच्या रूपाने सत्य आणि इमानदारी दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर कृश होऊन पडली आहे. अयोध्येत तर श्रीरामांच्या पादुका आणि सीतामाईची आभूषणे चोरीस गेली. श्रीरामांनी व्यक्तिगत भावनांपेक्षा प्रजेच्या न्यायाला, लोकभावनांना महत्त्व दिले. श्रीरामांनी व्यक्तिगत संपत्ती निर्माण केली नाही. ते रामराज्य जनतेचे होते. आज अयोध्येत चोर आहेत. दिल्लीत चोरीचा माल घेऊन शिंदे फिरत आहेत. कायदा आहे कोठे? न्यायालयात महिला न्यायासाठी आक्रोश करीत असताना सरन्यायाधीश पुढची तारीख देऊन निघून गेले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चोरीस गेली. श्रीरामांचे सत्त्व चोरले…
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]






























































