जरांगे-पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलू नये – राधाकृष्ण विखे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू करून त्यांना आश्वासित केले आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.

अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्या प्रत्येक मागणीवर सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासकीय स्तरावर त्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या दौऱ्याचे नियोजनही केले आहे. या माध्यमातूनही जातप्रमाणपत्रांच्या अडचणी दूर करण्यात मोठी उपलब्धता होईल. मात्र, सर्व सकारात्मक गोष्टी सुरू असताना जरांगे-पाटील यांनी आज अचानक उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांना मी पुन्हा विनंती करतो की, त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. शासन तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करीत आहे. या संदर्भात मी आणि अधिकारी पुन्हा त्यांना भेटायला तयार आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. त्यांची कुठलीही योजना बंद होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, असे विखे यांनी सांगितले.