जरांगेंनी फडणवीसांवरच आरोप का केले? अंबादास दानवे यांचा सवाल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ‘सलाईनमधून विष देऊन मला संपवण्याचे किंवा माझे एन्काऊंटर करण्याचे षड्यंत्र देवेंद्र फडणवीस यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवरून विधीमंडळात मंगळवारी सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी उडाली. यावेळी विधानपरिषदेत बोलताना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांवरच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

”मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन फक्त त्यांच्यावरच आरोप केले. गेल्या दोन महिन्यात त्यांनी ना कधी मुख्यमंत्र्यांवर ना कधी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केले. पण फक्त फडणवीसांवरच आरोप का केले, याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी दानवे यांनी केली.