‘जुमला 3’ भाजपच्या जाहीरनाम्याचा नवा सिझन! उद्धव ठाकरेंचे फटकारे

ओटीटीवर जसे मालिकांचे सिझन असतात, तसा देशात भाकड जनता पक्षाचा ‘जुमला 3’ हा नवीन सिझन आलाय. 2014 आणि 2019ला पहिला-दुसरा सिझन आला होता. पण, दहा वर्षांत या मालिकेने महाराष्ट्र आणि देश नासवला, असे फटकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावले. परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

सभेवेळी झालेल्या जोरदार पावसाला न जुमानता उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि मिंधेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी वादळात उभा राहणार आहे, मी संकटाशी झुंज देणार आहे, हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे. मी मागे हटणार नाही, मी लढायला उभा राहिलो आहे. येऊ द्या संकट हवं तेवढं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत. त्या संकटाला चिरडून टाकलं तर हे पावसाचं संकट काय आहे? मी परभणीकरांना साष्टांग दंडवत घालतोय. कारण परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुम्ही सगळे सैनिक आणि मावळे आहात. भाजप, मिंध्यांना वाटलं असेल की पैशांनी सगळं काही खरेदी करता येतं पण परभणीकर विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेनाप्रमुखांनी कमवलेलं प्रेम आशीर्वादाच्या रुपाने समोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. वादळाला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाही. आम्ही वादळाच्या छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत. मशाल गीतात जे शब्द आहेत, जय भवानी, जय शिवाजी. मोदी शहांचा नोकर असलेला निवडणूक आयोग आहे, त्याने सांगितलं की जय भवानी शब्द काढा. मी म्हणतो तुम्हाला कान धरून हा महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी म्हणत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. तुमचा महाराष्ट्राच्या आकसाचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना, बघा प्रयत्न करून. मी इथे उभा आहे आणि सोबत हे मर्द मावळे उभे आहेत. आम्ही सुद्धा जय श्री राम, जय बजरंगबली म्हणतो. पण जय भवानी विषयी तुमच्या मनात इतका आकस, द्वेष का आहे? यांना काय वाटतं की दिल्लीत बसले की आपण म्हणू तसं देश ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, गुरंढोरं नाही.अंगावर आलात, प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली, पण पाठीवर वार केला तेव्हा माझी वाघनखं बाहेर आली आहेत, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी या सभेतून दिला.

‘हा महाराष्ट्र शिवरायांचा, साधुसंताचा महाराष्ट्र आहे. तो महिलेचा अपमान कधी सहन करत नाही. पण याच सरकारच्या विकृत बुद्धीच्या मुनगंटीवारने प्रचारसभेत बहीण भावाच्या नात्याविषयी जे बोलले, ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणारा आहे. मोदीजी तुम्ही तुमच्या अलिकडे पलिकडे बसलेल्या माणसांविषयी बोलत का नाही? तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली म्हणता, मग तुमच्या आजूबाजूचे टिनपाट वाटेल ते बोलतात, महिलांचा अपमान करताहेत. मराठवाड्यातले एक मंत्री, त्यांनी सुप्रिया सुळेंना चॅनलसमोर शिवी दिली. पण मोदी-शहा काही बोलायला तयार नाहीत. महिलांचा अपमान केलात तरी चालेल पण आम्हाला मतं द्या, असा यांचा कारभार आहे. अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातलं एकही मत मिळता कामा नये.’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

मोदींच्या जुमलेबाजीवर घणाघात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही. म्हणून गद्दारांकरवी बाळासाहेबांचा चेहरा दाखवून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करताहेत. मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवर बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलणारच. ओटीटीवर जसे सीझन असतात तसा देशात या भाकड जनता पक्षाचा नवीन सिझन आला आहे, जुमला 3. 2014 साली जुमला 1 आला, 2019 साली जुमला 2 आणि आता 2024 साली येईल तो जुमला 3. अभिनेता, खलनायक, लेखक तोच. आता किती वेळा ती मालिका पाहायची. आम्हाला पहिल्या दोन भागांत मालिका बरी असेल असं वाटलं होतं. पण दहा वर्षांत महाराष्ट्र, देश नासवून टाकला. त्यामुळे आता अबकी बार, भाजप तडीपार. ही मालिका आता बंद करा, कारण ती पाहून कुणाचंच पोट भरलेलं नाही. म्हणून तुमच्यासाठी लढणाऱ्या उमेदवाराला मताधिक्क्याने निवडून द्या. समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालेलं यावेळी मला हवं आहे. कारण ही निवडणूक फक्त शिवसेनेची नाही. ही संपूर्ण देशासाठी हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. निवडणुकीचं चिन्ह मशाल आणि विजय होणार विशाल, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.