नाशिकमधील ररस्त्यांची दुरवस्था, शिवसेनेचा 17 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेवर मोर्चा; आदित्य ठाकरे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेनेतर्फे नाशिक महानगरपालिकेवर 17 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून सुरू होऊन महापालिकेपर्यंत जाणार आहे. या मोर्चात नाशिककरांनी पक्षीय तसेच इतर वैचारिक भेदभाव विसरून नाशिकसाठी रस्त्यावर उतरा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. सुरुवातील त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सरकारला जाब विचारणाऱ्या दोन शाळकरी मुलांची पेगलवाडी येथील त्यांच्या शाळेत जाऊन भेट घेतली. तसेच त्यानंतर पेगलवाडी त्र्यंबक रोड, अंबड सातपूर लिंक रोड, कॅनडा कॉर्नर परिसर, शरणपूर लिंक रोडची देखील पाहणी केली. याबाबत

”नाशिकमध्ये एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सुरू आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. कुठे गॅस पाईपच काम सुरू आहे सांगितलं जात तर कुठे आणखी काही. ही सगळी कामं देखील कधी सुरू असतात तर कधी ठप्प. आमचा दौरा सुरू होण्यापूर्वी अचानक रात्री दीड वाजता ऐन पावसात रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली. सकाळी पहिले तर रस्त्यांची अवस्था पुन्हा पहिल्यासारखीच. एकूणच अयोध्येतली चंदाचोरी असो, किंवा सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशांचे खड्डे भरणे असो, भाजपला जनतेची सर्वसामान्य नागरिकांची काळजी नसल्याचेच दिसून येते”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

तसेच आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत 17 ऑगस्टला शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. ”येत्या सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मोर्चा आयोजित केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून नाशिक महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱ्या या मोर्चावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पक्षीय तसेच इतर वैचारिक भेदभाव विसरून नाशिकसाठी रस्त्यावर या”, असे त्यांनी ट्विट केले आहे.