आश्रमशाळेत अन्नात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा, जिवती तालुक्यातील नगराळा येथील आश्रमशाळेतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेवणात पाल पडल्याने आश्रमशाळेतील 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने पालक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सर्व बाधित विद्यार्थ्यांवर राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेवण बनवताना त्यात पाल पडली होती. याकडे दुर्लक्ष करून तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसू लागल्याने शाळा प्रशासनाने बाधित विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सोनारकर यांनी दिली.