सामना अग्रलेख – सरसंघचालकांची कृष्णभावना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णभावना ही सत्य, धर्म, न्यायाच्या बाजूने असते. अशी कृष्णभावना भारतात राहिलेली नाही. भारतातले वातावरण कृष्णभावनेच्या विरुद्ध आहे. मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी या देशात राहूच नये असे दिल्लीतील राज्याराज्यांतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना वाटते तसे त्यांचे वर्तन आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उत्तराखंडमधील हल्दवानी येथे सभेसाठी गेले. त्यांच्या सभेनंतर भाजपमधील हिंदुत्ववाद्यांनी खरगे यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणाचे शुद्धीकरण केले. भाजपमधील धर्म, जात अमानवी व्यवहार हा असा टोकाचा आहे. भागवतांनी अमेरिकेत मांडलेल्या कृष्णभावनेत हे उपद्व्याप बसतात काय? भारतात येऊन जरा यावरही बोला!

पंतप्रधान मोदी सध्या उझबेकिस्तान वगैरे देशांत आहेत, तर सरसंघचालक मोहन भागवत ‘ट्रम्प’देशी न्यूयॉर्कमध्ये आहेत. भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याला तेथील अनेक संघटना, स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला. भागवत यांना झालेला विरोध हा मोदी-शहांच्या धर्मांधतेला, निर्घृण राजकारणाला झालेला विरोध आहे. महात्मा गांधींच्या हत्याऱ्यांनी आमच्या भूमीवर पाय ठेवू नये अशा घोषणा भागवत यांच्या आगमनाच्या वेळी देण्यात आल्या. भारताबाहेर संघाची प्रतिमा ही धर्माधर्मात भेद करणारी, महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे तारणहार अशीच आहे व मोदी-शहांनी भारताचा ताबा घेतल्यापासून संघाला या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी जाहीर केले की, ‘‘भागवत किंवा संघ अमेरिकेतील हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही.’’ भागवत यांच्या आगमनास न्यूयॉर्कचे मेयर ममदानी यांनी विरोध केला. भागवतांचा कार्यक्रम सरकारी नसल्याने मी तो रोखू शकत नाही असे मेयर ममदानी म्हणतात. एकंदरीत भागवतांचा अमेरिका दौरा वादात सापडला तरी त्यांनी त्यांचे ठरलेले कार्यक्रम केले, भाषणे वगैरे आटोपली. भागवत यांनी अमेरिकेत ज्या भूमिका मांडल्या त्या भारतातील त्यांच्या समर्थकांना व मोदींच्या अंधभक्तांना पटणाऱ्या नाहीत. ‘‘जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की, भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाहीच. जर तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल तर सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे नेणारे आहेत आणि प्रत्येक मानवाला प्रतिष्ठा आहे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे,’’ असे भव्यदिव्य विचार सरसंघचालकांनी अमेरिकेत मांडले. संघ म्हणून आमचा असा विश्वास आहे की, संपूर्ण मानवता एकच आहे, असेही भागवत म्हणाले. भागवत यांनी न्यूयॉर्कमधील ‘इस्कॉन’ मंदिराला भेट दिली. बेघरांसाठी

अन्न वितरण उपक्रमात

हभाग घेतला. यावेळी त्यांनी कृष्णविचार मांडला. ते म्हणतात, ‘‘आज जगात अनेक संघर्ष आहेत, अनेक अंतर्विरोध आहेत, परंतु या सर्वांना एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना. ती चेतना म्हणजे कृष्णभावना.’’ ‘धर्म वेगवेगळे, भावना एकच’ असा वैश्विक संदेश अमेरिकेच्या भूमीतून सरसंघचालकांनी दिला. भागवतांनी अमेरिकेत जाऊन वेगळे काहीच केले नाही. अमेरिकेतील लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीत बसेल इतकेच ते तोलूनमापून बोलले. विविधतेतून एकता आणि मानवतावादावर भागवतांनी जे विचार मांडले त्या प्रवचनात अमेरिकन लोकांना रस नाही. प्रत्यक्षात भारतात सध्या जे सुरू आहे, ते भागवतांच्या विचारांच्या एकदम विपरीत घडत आहे. भागवतांनी भगवान श्रीकृष्णावर भाष्य केले. त्यामुळे यापुढे श्रीरामाची आरती बंद केली काय? असा प्रश्न उपस्थित होतो. या मंडळींच्या दृष्टीने रामाचे महत्त्व राजकीयदृष्टया संपले आहे. राममंदिरावर ज्यांनी दरोडे टाकले ते ‘भाजपाई’ व संघ समर्थकच आहेत. राममंदिर उभारणीसाठी अमेरिकेतील हिंदू समाजाने मोठय़ा प्रमाणावर दान दिले. त्याची लूट अयोध्येत झाली. या लुटीवर ना पंतप्रधान मोदींनी भाष्य केले ना सरसंघचालकांनी. त्यामुळे अमेरिकेच्या भूमीवर भागवतांनी श्रीरामाऐवजी कृष्णविचार मांडून सुटका करून घेतली. जगात अनेक संघर्ष सुरू आहेत. ते कृष्णभावनेने संपतील हा विचार खरा मानला तर इस्रायलने ‘गाझा’ पट्टीतील 50 हजारांवर बालकांना ठार केले. त्यावर संघाने मानवतेचा कळवळा दाखवला नाही. उलट हा ‘बालसंहार’ करणाऱ्या नेतान्याहूला मिठ्या मारण्याचे काम एकेकाळचे संघ प्रचारक मोदी यांनी केले. इराणच्या शाळेवर बॉम्ब टाकून पाचशे लहान मुलींच्या हत्येतले गुन्हेगार अमेरिका व इस्रायलमध्ये आहेत. या

नरसंहाराबद्दलही

रसंघचालकांकडून निषेधाचे दोन शब्द बाहेर पडले नाहीत. कृष्णभावना ही सत्य, धर्म, न्यायाच्या बाजूने असते. अशी कृष्णभावना भारतात राहिलेली नाही. कृष्णाने अर्जुनाला संदेश देताना म्हटले आहे, ‘‘हे अर्जुना, खरे ज्ञान समजून घेण्यासाठी ज्ञानी लोकांच्या चरणाशी जा. त्यांना तुझ्या मनातील शंका, जिज्ञासा याबाबत विनम्रतेने प्रश्न विचार. शिकण्याची भावना ठेव. तुला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यातून तुला ज्ञानप्राती होईल.’’ कृष्णभावना अशी आहे की, उत्तम गुरू फक्त प्रवचन झोडत नाही. माझेच खरे व मीच खरा असे मानत नाही. तो आदेश देत नाही. तो प्रश्न समजून घेतो. प्रश्न विचारणाऱ्याला चेतना देतो. म्हणूनच महाभारताच्या रणमैदानावरही अर्जुन प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्ण संयमाने उत्तर देतो. ही भारतीय मातीतली कृष्णभावना आहे. श्रीकृष्ण सांगतो, ‘‘जो कुणाचा द्वेष करत नाही, सगळयांच्या बाबतीत मित्रत्व आणि करुणा ठेवतो, अहंकारावर विजय मिळवतो आणि सुखदुःखातही संतुलन ठेवतो तोच श्रेष्ठ ठरतो.’’ कृष्णाच्या मते शिक्षण केवळ बुद्धीचा विकास करण्याचे नाव नाही. शिक्षणाच्या बरोबर एक उत्तम ‘मनुष्य’ होणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. भारतातले वातावरण कृष्णभावनेच्या विरुद्ध आहे. मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी या देशात राहूच नये असे दिल्लीतील व राज्याराज्यांतील भाजपच्या सत्ताधाऱयांना वाटते व तसे त्यांचे वर्तन आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उत्तराखंडमधील हल्दवानी येथे सभेसाठी गेले. त्यांच्या सभेनंतर भाजपमधील हिंदुत्ववाद्यांनी खरगे यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणाचे शुद्धीकरण केले. भाजपमधील धर्म, जात व अमानवी व्यवहार हा असा टोकाचा आहे. भागवतांनी अमेरिकेत मांडलेल्या कृष्णभावनेत हे उपद्व्याप बसतात काय? भारतात येऊन जरा यावरही बोला!