
‘‘हिंदुस्थानींना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटतो असे मोहन भागवत न्यूयॉर्कमध्ये जाऊन सांगतात, मग देशात असताना त्यांची ही भावना कुठे जाते? देशात लिंचिंग होते, विविधतेचे रक्षण होत नाही, तेव्हा ते त्यावर काहीच का बोलत नाहीत? हा आपलेपणा आणि आत्मीयता तेव्हा का दिसत नाही,’’ असा बोचरा सवाल खासदार कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना आज केला.
मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये केलेल्या भाषणावर सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. हे भाषण भागवतांचे आहे की राहुल गांधींचे असा प्रश्न मला पडल्याचे सिब्बल म्हणाले. ‘‘हिंदुस्थानी नागरिक एकमेकांचा विचार करतात. एकमेकांप्रती सहवेदना बाळगतात’’ असे भागवत न्यूयॉर्कमध्ये म्हणाले होते. त्यावरून सिब्बल यांनी भागवतांवर निशाणा साधला. ‘‘न्यूयॉर्कमध्ये भागवत जे बोलले, ते त्यांच्या आचरणात कधी दिसले नाही. ‘भारत माता की जय’ म्हटलं नाही म्हणून जेव्हा एखाद्याला मारहाण होते, तेव्हा त्यांनी कधी आवाज उठवला नाही. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्यावर ते काही बोलले नाहीत. पेलेट गन चालल्या तेव्हा काही बोलले नाहीत. जेलमधून बाहेर आलेल्या बलात्काऱ्यांचे भाजपवाल्यांनी स्वागत केले तेव्हाही काही बोलला नाहीत. मग तुमच्या भाषणाचा अर्थ काय घ्यायचा,’’ असा सवाल सिब्बल यांनी केला.
विविधतेचे स्वागत करण्याच्या भागवत यांच्या वक्तव्यावरही सिब्बल यांनी भाष्य केले. ‘‘भागवत विविधतेबद्दल बोलतात, पण जो राजकीय पक्ष विविधतेचा स्वीकारच करत नाही त्याला पाठिंबा देतात. तो पक्ष सत्तेवर येईल यासाठी प्रयत्न करतात,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘‘बोलायला काहीही बोलता येते. पण ते कृतीतून दिसले पाहिजे,’’ असा टोलाही सिब्बल यांनी हाणला. शाश्वत विकासाच्या भागवत यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली. ‘‘लोकांना जगूच देत नसाल तर शाश्वत विकास होणारच कसा,’’ असा प्रश्नही सिब्बल यांनी केला.
मोहन भागवत न्यूयॉर्कमध्ये जाऊन जे बोलले, तेच त्यांनी हिंदुस्थानात येऊन बोलावे. मग आम्ही म्हणू की ते खरे विश्वगुरू आहेत.’’




























































