
अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी इशारे देऊनही सरकार हिमालयातील डोंगररांगांवर बुलडोझर चालवत आहे. डोंगर फोडून रस्ते बांधत आहे, बोगदे बनवत आहे. धोकादायक जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्याने माणूसही जमेल तेथे, जमेल तसे डोंगर फोडून इमारती बांधत आहे. सरकार आणि समाजाला आज हे ‘विकासाचे दूत’ वाटत आहेत. मात्र तेच उद्या हिमालयातील ‘यमदूत’ बनतील आणि शेकडो-हजारो लोकांचे प्राण घेतील, हे स्पष्ट आहे. हिमालयाच्या तांडवाने नेपाळमध्ये गुरुवारी आलेल्या महाप्रलयाने हाच इशारा दिला आहे.
नेपाळवर गुरुवारी भयंकर नैसर्गिक संकट कोसळले. तेथे अचानक आलेल्या महाप्रलयाने शेकडो लोकांचा जीव घेतला. हजारो घरे, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुख्य म्हणजे पाऊस नसतानाही हा सगळा विध्वंस झाला. तिबेट हद्दीतील ल्हेंदे नदीत डोंगराचा एक भाग हिमकड्यासह कोसळला. त्याने नदीचे 20 किलोमीटरपर्यंतचे पाणी अडवले. तेथे एका बंधारा तयार झाला. तोच नंतर फुटला आणि तेथे अडवले गेलेले हजारो क्युसेक्स पाणी महाप्रचंड लोंढा बनून अतिवेगाने भोटेकशी नदीत आले आणि सुनामीप्रमाणे नेपाळमध्ये समोर येईल तो भाग, घरे, माणसे, गुरेढोरे गिळंकृत करीत गेले. असाच पाण्याचा एक लोंढा त्रिशुळी नदीमधूनही पुढे सरकत केला आणि त्यानेही प्रचंड विध्वंस घडविला. अवघ्या काही मिनिटांत हे सगळे घडले. मृतांचा आकडा नक्की सांगता येत नसला तरी महाप्रलयाने गिळंकृत केलेली गावे, घरेदारे आणि बेपत्ता लोकसंख्येचे प्रमाण पाहता मरण पावलेल्यांची संख्या कितीतरी अधिक असणार, हे स्पष्ट आहे. नेपाळवर कोसळलेले हे महाभयंकर संकट नैसर्गिक असले तरी त्याचे मूळ शेवटी माणसाने केलेला
निसर्गाचा विध्वंस
आणि पर्यावरणाचा विनाश यातच आहे. मागील काही दशकांत ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे इशारे-नगारे जगभरात वाजवले जात आहेत. वातावरणातील कार्बन वायू कमी करण्याच्या जागतिक आणाभाका घेतल्या जात आहेत. मात्र त्या शब्दांच्याच वाफा ठरल्याने तापमानवाढीचा मोठा परिणाम पृथ्वीवरील ‘ग्लेशियर्स’वर झाला आहे. याच संकटांचे ढग हिमालयन पर्वतरांगांवरही गडद झाले आहेत. हिमालयातील ग्लेशियर्स अत्यंत वेगाने वितळत आहेत. तापमान वाढल्याने नवीन ग्लेशियर्स बनत नाहीत आणि जे अस्तित्वात आहेत ते वितळत आहेत. असंख्य हिमकडे हिमनद्यांमध्ये कोसळत आहेत. गंगोत्री ग्लेशियरसारख्या महत्त्वाच्या हिमनद्याही काही वर्षांपासून मागे मागे हटत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळून हिमालय पर्वतरांगांमध्ये हजारो धोकादायक हिमनद सरोवरे, बंधारे तयार झाले आहेत. हीच हिमनद सरोवरे आणि बंधारे तिबेट-नेपाळपासून भारतातील कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या प्रदेशांसाठी ‘मृत्यूच्या टांगत्या तलवारी’ बनल्या आहेत. गुरुवारी नेपाळमध्ये यांपैकीच एक तलवार कोसळली आणि
शेकडो लोकांचे प्राण
घेऊन गेली. लाखो घरे, मालमत्ता उद्ध्वस्त करून गेली. या संकटासाठी निसर्गाकडे बोट दाखवून माणसाला हात वर करता येणार नाहीत. मानवी जीवन सुलभ आणि सुरक्षित होण्यासाठी विकास आवश्यकच आहे, परंतु विकासाचा हव्यास आणि त्यातून माणसाने चालविलेली निसर्गाची बेलगाम लूट, छेडछाड आणि तोडफोड माणसानेच माणसाच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड ठरत आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी इशारे देऊनही सरकार हिमालयातील डोंगररांगांवर बुलडोझर चालवत आहे. डोंगर फोडून रस्ते बांधत आहे, बोगदे बनवत आहे. धोकादायक जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्याने माणूसही जमेल तेथे, जमेल तसे डोंगर फोडून इमारती बांधत आहे. सरकार आणि समाजाला आज हे ‘विकासाचे दूत’ वाटत आहेत. मात्र तेच उद्या हिमालयातील ‘यमदूत’ बनतील आणि शेकडो-हजारो लोकांचे प्राण घेतील, हे स्पष्ट आहे. हिमालयाच्या तांडवाने नेपाळमध्ये गुरुवारी आलेल्या महाप्रलयाने हाच इशारा दिला आहे.































































