
महाराष्ट्र शासनाच्या ‘महा-IT’ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण ऑनलाईन पोर्टल्स मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्कॉलरशिप, वसतिगृहातील प्रवेश, आधार योजना, स्वाधार योजना, स्वयंभू योजना या महत्त्वाच्या वेबसाईट मागील दीड महिन्यापासून बंद आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महा IT या वेबसाईड द्वारे भारत सरकारची स्कॉलरशिप, महाराष्ट्राची प्रतिपूर्ती योजना आदींची कामे केली जातात. यामध्ये अनुसूचित जाती- जमाती, obc, भटक्या जमाती, खुल्या वर्गातील अर्ज स्वीकारण्यात येतात. मात्र मागील दीड महिन्यापासून ही वेबसाईट कार्यान्वितच नाही. सोबतच वसतिगृहातील प्रवेश, आधार योजना, स्वाधार योजना, स्वयंभू योजना या वेबसाईटही बंद आहेत. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना वंचित ठेवून निधी दुसरीकडे वळविण्याचा सरकारचा हा डाव असू शकतो, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केला आहे.

























































