
आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. शिंदे यांना कुणी बंदी केले होते, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.
मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर टीका करताना पवार म्हणाले की, उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता हेच चुकीचे आहे. ‘या’ उदाहरणाची आणि ‘त्या’ उदाहरणाची तुलनाच होऊ शकत नाही. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल… छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. यांना कुणी बंदी केले होते असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे सभागृहात गटनेते होते. 2014 मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा आणि नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अधिवेशनात काम करणार असल्याची माहिती पवारसाहेबांना दिली असेही अजित पवार म्हणाले. 6 डिसेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीमध्ये शेतकरी दिंडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले.