
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात पूरस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून रविवारी नदीचे पाणी बाजार पुलाला लागले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठावरील नागरिक तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल, नगरपालिका, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच विनाकारण नदीपात्र आणि पूल परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






























































