12 वर्षांत LPG च्या दरात 530 रुपयांची वाढ; आता भाजप नेते रस्त्यावर का उतरत नाहीत? मल्लिकार्जुन खरगे यांचा थेट सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईने होरपळलेल्या जनतेला रविवारी सकाळी मोदी सरकारकडून आणखी एक भेट मिळाली. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये तब्बल 29 रुपयांची वाढ झाली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांमध्ये घरगुती गॅसच्या किमतीत 89 रुपयांची वाढ झाली आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या काळात घरगुती एलपीजीच्या दरवाढीच्या ज्वाळांनी सामान्य जनतेचे स्वयंपाकघर भस्म करण्याचा विडा उचलला आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून खरगे यांनी मोदी सरकारला घेरत 3 तिखट सवालही केले. पंतप्रधान मोदींनी संसदेत मोठी भाषणे ठोकताना सांगितले होते की, आखातातील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी हिंदुस्थान 41 देशांमधून इंधनाची आयात करत आहे. जर 41 देशांमधून इंधनाचे पर्याय शोधले होते, तर त्याचे काय झाले? आज देशातील ग्रामीण भागांत अजूनही एलपीजी सिलिंडरचा तुटवडा का जाणवत आहे?

खर्गे यांनी वर्ष 2025-26 मधील उज्ज्वला योजनेच्या अधिकृत आकडेवारीचा हवाला देत सरकारची कोंडी केली आहे. ही आकडेवारी आखातातील संकटाच्या आधीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2025-26 मध्ये उज्ज्वला योजनेच्या तब्बल 5.56 कोटी कुटुंबांनी वर्षात केवळ एक किंवा एकही सिलिंडर घेतला नाही. यापैकी 3.30 कोटी कुटुंबांनी तर एकदाही सिलिंडर भरला नाही. सर्वसामान्यांची ही आर्थिक कोंडी मोदी सरकारच्या लूटनीतीचा परिणाम नाही का?

“टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे पंतप्रधानांचे धोरण, याची राजकीय किंमत…”, LPG च्या दरवाढीवरून शरद पवारांनी सुनावले

युपीए सरकारच्या काळात महागाईवर गदारोळ माजवणाऱ्या भाजप नेत्यांवर खरगे यांनी हल्ला चढवला. गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 530 रुपयांची अवाढव्य वाढ केली आहे, हे सत्य नाही का? युपीएच्या काळात रस्त्यावर सिलिंडर घेऊन आंदोलने करणारे भाजपचे नेते आणि स्वतः मोदीजी आता शांत का आहेत? ते आता सिलिंडर घेऊन रस्त्यावर का बसत नाहीत?

हेच भाजपचे मॉडेल – टीएमसी

तृणमूल काँग्रेसने या दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे तृणमूलने म्हटले. जेव्हा जागतिक संकटे येतात तेव्हा गरीब चिंतेत असतात आणि श्रीमंतांची भरभराट करून घेतात, हेच भाजपचे मॉडेल आहे, अशी टीका तृणमूलने केली.