
सर्वसामान्यांचा कडाडून विरोध असतानाही वीज मंडळाने जबरदस्तीने माथी मारलेल्या स्मार्ट मीटरमध्ये आता अतिस्मार्ट घोळ सुरू झाले आहेत. अनेक ग्राहकांची वीज बिलांची रक्कम थेट दहा पटीने वाढली आहे. दोन हजारांपर्यंत येणारे महिन्याचे बिल थेट २० हजार रुपयांवर गेल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. विशेष ही वाढीव रक्कम कमी करण्यास महावितरण कंपनीने नकार दिल्यामुळे ग्राहकांना नाईलाजास्तव या वाढीव रकमेची बिले भारावी लागत आहेत.
ग्राहकांचा विरोध असतानाही नवी मुंबईच्या अनेक भागांत महावितरण कंपनीने स्मार्ट वीज मीटर बसवले आहेत. या मीटरमुळे वीज बिलांच्या रकमेत मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सध्या वीज मंडळाकडे मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत.
तळोजा येथील फेज एकमध्ये सचिन डांगे हे भाडेतत्त्वावर राहतात. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी त्यांच्या घरातील वीज बिल जानेवारी महिन्यात एक हजार ७४० इतके आले होते. मार्चमध्ये आलेल्या बिलाची रक्कम दोन हजार इतकी होती. एप्रिलमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आणि बिलाची रक्कम थेट ११ हजार २८० रुपये झाली. मे महिन्याचे बिल त्यांना १९ हजार ३४० रुपये आले. मोठ्या रकमेचे बिल आल्यामुळे डांगे यांनी महावितरणकडे तक्रार केली आहे.
महावितरणची उडवाउडवी
वनबीएचके घराचे बिल अवाचे सवा रकमेचे बील पाठवल्यानंतर ही रक्कम कमी करण्यासाठी महावितरणचे अधिकारी ग्राहकांना कोणतीही मदत करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्याचा सल्ला फक्त दिला जात आहे, असा आरोप सचिन डांगे यांनी केला आहे.





























































