वाटदमधील संरक्षण प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा, वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील प्रस्तावित संरक्षण प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा. तसेच वाटद परिसरात एखादा नवीन प्रकल्प येणार असेल तर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी गावागावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून प्रकल्पाची सर्वप्रथम माहिती घ्यावी.प्रकल्प थेट लादू नये. फळप्रक्रिया,ऑटोमोबाइल्स किंवा आयटी क्षेत्रातील प्रकल्प असतील तर आम्ही त्या प्रकल्पाचे पुढे येऊन स्वागत करू पण जनतेला त्रासदायक, पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प नको अशी ठाम भूमिका वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती गेली दोन वर्षे वाटद परिसरातील प्रस्तावित संरक्षण प्रकल्पाला विरोध करत लढा देत आहे. आज रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर, संतोष बारगुडे, सहदेव वीर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.याबैठकीत वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडताना संरक्षण प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. संरक्षण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार असल्याने स्थानिकांचा आंबा-काजू बागायती आणि मासेमारी व्यवसाय संपुष्टात येईल. त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे.एमआयडीसीच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देत विरोध नोंदवला आहे. त्यामुळे विरोधाचा विचार करून संरक्षण प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रथमेश गावणकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, संरक्षण प्रकल्पांची अधिसूचना जाहीर करताना स्थानिकांची भूमिका विचारात घेतली नाही. वाटद परिसरात आम्हाला संरक्षण प्रकल्प का नको याची कारणे आम्ही प्रशासनासमोर मांडली. दरम्यानच्या काळात आम्ही ॲड. असीम सरोदे यांचे मार्गदर्शन घेतले. वाटद परिसरातील संरक्षण प्रकल्पाबाबत पुनर्विचार होऊन तो रद्द व्हावा. वाटद एमआयडीसीची आपण अधिसूचना काढली आहे त्यामध्ये जे वर्षानुवर्षे लोक रहात आहेत. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. कुळवहिवाटखाली ज्यांचे दावे आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्यात कोणताही प्रकल्प येण्यापूर्वी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि अन्य अधिकारी वर्गाने ग्रामस्थांशी संवाद साधून प्रकल्पाची माहिती घ्यावी. थेट प्रकल्प लादू नये.पर्यावरणपूरक प्रकल्प असेल. फळप्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाइल्स आणि आयटी क्षेत्रातील उद्योग असेल तर, आम्ही पुढे येऊन त्यांचे स्वागत करू, असे गावणकर यांनी सांगितले.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संरक्षण प्रकल्पाबाबात अहवाल तयार करण्याचा आदेश प्रशासनाला दिला असून गावागावात प्रकल्पासंदर्भात संवाद सभा आयोजित करण्यात येतील असे सांगितले.

सामाजिक प्रश्नावर आम्ही लढत रहाणार – प्रथमेश गावणकर

आम्ही सामाजिक प्रश्नांवर लढत आहोत. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर आम्ही टिकू शकणार नाही. त्यांनी शासन आणि प्रशासन जर हातात घेतलं तर आम्हाला माघार घ्यावी लागेल पण सामान्य नागरिक म्हणून आम्ही लढत राहू आमच्या हक्कांसाठी  असे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.