मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत स्टॅलिन यांची ‘स्टाईल’ मारली, डीएमकेचे वाॅक आऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचे भाषण सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. भाषण संपवताना विजय यांनी केलेल्या हातवाऱ्यामुळे त्यांची माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हातवाऱ्याशी तुलना होत आहे. सध्याच्या घडीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मंगळवारी विधानसभेत बोलताना विजय यांनी डीएमके सरकारवर कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. त्यांच्या वक्तव्यांमुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. डीएमके आमदारांनी या आरोपांचा निषेध करत सभात्याग केला.

मात्र, या राजकीय वादापेक्षा विजय यांच्या भाषणाच्या अखेरीस घडलेला प्रसंग अधिक चर्चेत आला. भाषण संपवण्यापूर्वी त्यांनी अध्यक्षांची परवानगी घेतली आणि आपल्या चित्रपटांमधील शैलीची आठवण करून देणारा एक खास हातवारा केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही क्षणांतच या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. राजकीय वर्तुळात या हातवाऱ्याची तुलना स्टॅलिन यांच्या यावर्षी व्हायरल झालेल्या एका इशाऱ्याशी केली जात आहे. काँग्रेससोबतच्या जागावाटप चर्चेनंतर डीएमके मुख्यालयातून बाहेर पडताना स्टॅलिन यांनी हात वर करत एक इशारा केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याचा अर्थ प्रकरण संपले किंवा सर्व काही सुरळीत झाले असा लावण्यात आला होता.

नंतर स्टॅलिन यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना तो इशारा पूर्णपणे उत्स्फूर्त असल्याचे सांगितले होते. तरीही त्या इशाऱ्याची चर्चा दीर्घकाळ सुरू राहिली. आता विजय यांच्या नव्या हातवाऱ्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे. दरम्यान, आपल्या भाषणात विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले. “आमचा पक्ष केवळ एका अभिनेत्याच्या लोकप्रियतेवर उभा राहिलेला नाही. अनेकजण आधी पक्ष स्थापन करतात आणि नंतर जनतेकडे जातात. आम्ही आधी जनतेमध्ये गेलो आणि त्यानंतर पक्ष स्थापन केला,” असे ते म्हणाले.

2026 ची विधानसभा निवडणूक पक्षाने कोणत्याही आघाडीशिवाय लढवली होती, याची आठवण करून देताना विजय म्हणाले, “आम्हाला 35 टक्के मते आणि 1.72 कोटी मतदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आम्ही स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून उदयास आलो आणि आज सत्तेत आहोत.” राजकीय विचारधारेविषयी बोलताना त्यांनी पेरियार ईव्ही रामस्वामी, बी आर आंबेडकर, के कामराज यांच्या विचारांचा उल्लेख केला. पेरियार यांच्या काही भूमिकांशी मतभेद असले तरी त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या तत्त्वांचा स्वीकार केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सामाजिक न्यायासाठी आंबेडकरांच्या विचारांना आणि प्रामाणिक प्रशासनासाठी कामराज यांच्या आदर्शांना आपला पक्ष बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजय यांच्या भाषणातील राजकीय संदेश आणि त्याहून अधिक त्यांच्या शेवटच्या फिल्मी हातवाऱ्याने तामिळनाडूच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.