
चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रत्नागिरीकरांसाठी पावसाने दमदार सलामी दिली आहे. आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरीकरांना ओलेचिंब केले. पहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. नाले-गटार तुंबून अनेक ठिकाणी पाणी साचले.
सोमवारी दुपारपासून रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रभर पाऊस कोसळत होता. पहिल्याच पावसात महावितरणची बत्ती गुल झाली होती. आज सकाळी रत्नागिरी शहरातील अनेक परिसरात गटराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्या घाणीतून मार्गक्रमण करणे नागरिकांना त्रासदायक ठरले. मारूती मंदिर येथील भाजी मार्केट समोरील रस्ता जलमय झाला होता. पाणी साचलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना अडचणीचे झाले होते.
गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46.66 मिमी पाऊस पडला.त्यामध्ये मंडणगड – 25.25 मिमी,दापोली 45.00 मिमी,खेड – 41.71 मिमी, चिपळूण – 30.88 मिमी,गुहागर – 76 मिमी, संगमेश्वर – 31.08 मिमी, रत्नागिरी – 91 मिमी, लांजा – 29.40 मिमी, राजापूर – 46.63 मिमी पाऊस पडला.





























































