
‘मेक माय टूर्स’ या टुर कंपनीच्या नावाखाली परदेशवारीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील दोन महिलांची १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिल्लीतील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. रत्नागिरी) आणि त्यांच्या मैत्रिणी वैभवी विजय खेडेकर यांनी टर्की (इस्तंबुल) सहलीसाठी ‘मेक माय टूर्स’ या कंपनीशी संपर्क साधला होता. संशयित आरोपी संदीप कुमार (वय ५१, रा. रोहिणी, दिल्ली) याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी सहलीचे नियोजन केले होते.
दिनांक २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत फिर्यादी समृद्धी मयेकर यांनी ५ लाख रुपये आणि वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबासाठी ७ लाख ४० हजार रुपये, अशी एकूण १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यांत जमा केली. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही आरोपीने या महिलांना सहलीसाठी परदेशात नेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी सहलीचे आयोजन केले नाही किंवा घेतलेले पैसेही परत केले नाहीत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित संदीप कुमार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
































































