किचनमधील मसाल्यांचा रंग बदललाय? वापरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हळद, तिखट, धणे, जिरे, गरम मसाला यांसारखे मसाले आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. अनेक घरांमध्ये हे मसाले मोठ्या प्रमाणात विकत घेऊन महिनोनमहिने वापरले जातात. मात्र कालांतराने मसाल्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांचा रंग, वास किंवा पोत बदलल्यास ते वापरणे सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, मसाले लगेच खराब होत नसले तरी योग्य साठवण न केल्यास त्यामध्ये बुरशी, ओलावा किंवा कीड निर्माण होऊ शकते.

 

मसाले दीर्घकाळ हवेशी संपर्कात राहिल्यास त्यांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक सुगंध, रंग आणि चव कमी होऊ लागते. जर मसाल्याचा रंग फिका किंवा मळकट झाला असेल, सुगंध कमी झाला असेल, मसाला चिकट वाटत असेल किंवा त्यातून विचित्र वास येत असेल, तर तो वापरणे टाळावे. तसेच पांढरा थर, बुरशी किंवा लहान कीटक दिसत असल्यास तो मसाला तातडीने फेकून द्यावा.

 

तज्ज्ञांच्या मते, अशा खराब झालेल्या मसाल्यांचा वापर केल्यास पोटदुखी, गॅस, अॅलर्जी, उलटी किंवा फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यात ओलाव्यामुळे मसाले लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते.

 

पावडर मसाले साधारणपणे सहा महिने ते एक वर्षाच्या आत वापरणे अधिक योग्य मानले जाते. साबूत मसाले तुलनेने जास्त काळ टिकतात, मात्र त्यांचीही चव आणि सुगंध कालांतराने कमी होतो. मसाले नेहमी हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवावेत. ओला चमचा वापरू नये आणि मसाले गॅसच्या उष्णतेपासून तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत.

 

तज्ज्ञांच्या मते, गरजेपुरतेच मसाले खरेदी करणे आणि शक्यतो साबूत मसाले घेऊन आवश्यकतेनुसार घरी दळणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. योग्य साठवण आणि वेळेवर वापर केल्यास मसाल्यांची चव टिकून राहते आणि आरोग्याचाही धोका टाळता येतो.