
पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा कळव्यातील पारसिक खाडीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आलम सय्यद (42), रिझवान सय्यद (42) आणि साहिल पोलंदास (30) अशी तिघांची नावे असून, तिघेही मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते. तिन्ही मृतदेह कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गालगत रेतीबंदर येथील खाडीत तीन तरुण रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी कळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, नारपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन आणि टीडीआरएफ कर्मचार्यांनी बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर टीडीआरएफ जवानांनी खाडीमध्ये बुडालेल्या तिन्ही व्यक्तींना सुमारे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढून कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
























































