
आबलोली ते जाकादेवी मार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मांजरे बुडबुड्याचे पाणी परिसरात एसटी बस आणि ॲक्टिव्हा दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून प्रवास करणारे दोन नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात २८ ऑगस्ट रोजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार राई रांजेवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील रहिवासी विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८) हा आपल्या ताब्यात असलेल्या ॲक्टिव्हा क्र.एम एच ४६बी जी ८१४९ वरून आपले वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रूपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना सोबत घेऊन राई येथून काजुर्लीच्या दिशेने जात होता.
त्याच दरम्यान, आबलोली ते जाकादेवी जाणाऱ्या रस्त्यावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी परिसरात समोरून येणाऱ्या एसटी बसची क्र.एम एच ४०एन ९८७० आणि ॲक्टिव्हा दुचाकीची समोरासमोर धडक झाली. एसटी बसचालक पुंडलीक शिवाजी केंद्र (वय ३५, रा. रत्नागिरी डेपो, मूळ रा. केंद्रवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याच्याकडून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या उजव्या बाजूला गेली आणि दुचाकीला धडक बसली.
या अपघातात दुचाकी चालवत असलेला तरुण विघ्नेश चव्हाण आणि मागे बसलेले त्याचे वडील अनंत चव्हाण हे दोघेही लहान-मोठ्या दुखापतींमुळे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेत दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी काजुर्ली मळेवाडी (ता. गुहागर) येथील रहिवासी प्रमोद अशोक जगताप (वय ४३) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर माहिती व तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी एसटी बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.


























































