
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी लखनौ येथील पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास अवघ्या तीन महिन्यांत राज्यात जातनिहाय जनगणना केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
अखिलेश यादव यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पायाभूत सुविधांवरूनही योगी सरकारला घेरले. बुंदेलखंड आणि गंगा एक्सप्रेसवेसह राज्यातील अनेक रस्ते खचत असल्याचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या स्पेस टेक्नॉलॉजी आणि डिझाइनवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. राज्यातील पोलीस व्यवस्थेवर टीका करताना हथेली गर्म, पोलीस नर्म, असा टोला त्यांनी लगावला आणि परराज्यातील माफिया उत्तर प्रदेशात येऊन हत्या करून जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
या सरकारला लूटमार करणारे सरकार म्हणत त्यांनी राम मंदिर देणगी चोरी, कन्नौज येथील काऊ मिल्क प्लांट आणि जेपीएनआयसी सारख्या महत्त्वाच्या इमारतींची विक्री यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सरतेशेवटी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या अमेरिकेतील हिंदू-मुस्लिम एकतेच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका करत, ‘हे लोक परदेशात एकतेच्या गप्पा मारतात आणि हिंदुस्थानात मात्र देश तोडण्याचे काम करतात’ असेही अखिलेश यादव म्हणाले आहेत.

























































