
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 13 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेसंदर्भात चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. कर्णधार कोणाला मिळणार पासून ते बुमराहच कमबॅक होणार का? इथपर्यंत चर्चा रंगल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांना BCCI ने पूर्णविराम दिला असून या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून टीम इंडियाच ब्रम्हास्त्र जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे.
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत थरार रंगणार आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचा संघ यजमान असला, तरी हे सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या मालिकेद्वारे अनेक प्रतिभावान खेळाडू दुखापतीतून सावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. यामध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती, फिरकी अष्टपैलू वाशिंगटन सुंदर, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि खूंखार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. निवडकर्त्यांनी संघात समतोल राखण्यावर भर दिला असून, संघात नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर असे चार तगडे अष्टपैलू खेळाडू निवडले आहेत. याशिवाय, गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांना स्थान मिळाले आहे, तर वेगवान गोलंदाजीत बुमराहला अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांची साथ लाभेल.
India’s squad for Afghanistan T20I series announced. #TeamIndia will play three T20Is against Afghanistan at New Delhi, beginning September 13.#AFGvIND pic.twitter.com/UqTUeZyHz8
— BCCI (@BCCI) September 1, 2026
अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सैमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.



























































