ओडिशात सापडलेल्या पाच दुर्मीळ ऑरंगुटान पिल्लांच्या तस्करीचे गूढ कायम, ५५हून अधिक सीसीटीव्ही तपासूनही धागादोरा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात कासुआरिना जंगलात पाच संकटग्रस्त ऑरंगुटान पिल्ले आढळून आल्यानंतर काही दिवस उलटले, तरी त्यांच्या तस्करीमागील सूत्रधारांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. ही पिल्ले कुठून आणली, त्यांना ओडिशात कोणत्या मार्गाने आणण्यात आले आणि त्यामागे नेमके कोणते तस्कर आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) हाती घेतला असून, वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो (WCCB) आणि राज्य वन विभागाचे अधिकारीही तपासात सहभागी आहेत. तपास पथकाने आतापर्यंत ५५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. तसेच पश्चिम बंगालमधील दीघा परिसरातील ५० हून अधिक हॉटेल्सची झडती घेण्यात आली असून, अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप तपासाला ठोस दिशा मिळालेली नाही.

महिंद्रा थारमुळे तपासाला सुरुवात

तपासाची सुरुवात ७ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ११.२५ वाजता भोगराईतील बिचित्रपूर जंगलाजवळ दिसलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थारपासून झाली. काही तासांनंतर पश्चिम बंगालच्या सीमेजवळील एका रोपवाटिकेत झाडांना चिकटून बसलेली ऑरंगुटानची पाच पिल्ले आढळून आली होती.

सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे या वाहनाचा माग काढत तपास यंत्रणा दीघा येथील हॉटेल व्यावसायिक जयंत मैती यांच्यापर्यंत पोहोचली.

त्यानंतर त्यांच्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. हॉटेलच्या परिसरात वर्णनाशी मिळतेजुळते एक एसयूव्ही वाहन आढळले. मात्र, जयंत मैती आणि त्यांचा मुलगा दोघेही तेथे नव्हते. विशेष म्हणजे, हॉटेलमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची उपकरणेही काढून टाकण्यात आली होती.

हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांचा तस्करीच्या रॅकेटशी थेट संबंध आढळून न आल्याने त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

तपासाची माहिती जाहीर करण्यास पोलिसांचा नकार

ओडिशाचे पोलीस महासंचालक विनयतोश मिश्रा यांनी तपासाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. तपासाबाबतची माहिती उघड केल्यास गुन्ह्यामागील आरोपी सावध होऊ शकतात, त्यामुळे तपास अत्यंत काळजीपूर्वक करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, STFचे पथक मोबाइल टॉवरचा डेटा, स्थानिक बंदरे आणि विमानतळांवरील हालचाली तसेच घटनास्थळाजवळ सापडलेल्या मास्कमधील फॉरेन्सिक पुरावे तपासत आहे. या पिल्लांना ओडिशात जमिनीमार्गे आणण्यात आले की समुद्रमार्गे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नंदनकाननमध्ये पिल्लांची प्रकृती स्थिर

बचाव करण्यात आलेली पाचही ऑरंगुटान पिल्ले सध्या भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राणिसंग्रहालयाने स्पष्ट केले आहे.

यातील एका पिल्लाला ताप आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सोमवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेल्या आरोग्यविषयक बुलेटिनमध्ये पाचही पिल्लांची प्रकृती ठीक असल्याचे प्राणिसंग्रहालयाने सांगितले.

पाच सदस्यांचे तज्ज्ञ पथक देखरेखीवर

मुख्य वन्यजीव संरक्षक प्रेम कुमार झा यांनी सांगितले की, ऑरंगुटान पिल्लांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच सदस्यांचे तांत्रिक तज्ज्ञ पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या पथकात म्हैसूर प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी, नवी दिल्लीतील नॅशनल झूलॉजिकल पार्कचे तज्ज्ञ, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), OUATच्या सेंटर फॉर वाइल्डलाइफ हेल्थचे तज्ज्ञ आणि नंदनकानन प्राणिसंग्रहालयाचे संचालक यांचा समावेश आहे.

दरम्यान, या पाच ऑरंगुटान पिल्लांना भारतात आणण्यामागे कोण आहे, त्यांचा मूळ अधिवास कोणता आहे आणि त्यांना ओडिशापर्यंत कोणत्या मार्गाने आणण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तपास यंत्रणांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.