संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा भाजप कार्यकर्त्याचा प्रस्ताव, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मध्ये एक विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव एका भाजप कार्यकर्त्याकडून वनविभागाला देण्यात आला आहे. तसेच या उद्यानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्यात यावे असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. वन विभागाकडून या प्रस्तावाचा विरोध करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रस्तावावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्याला फटकारले आहे. ”वेडेपणा आणि हव्यासाला कोणतीही सीमा नसते. ज्या माणसाने हा प्रस्ताव मांडला आहे, त्याची मानसिक स्थिती जर ठीक असेल, तर त्याला तुरुंगात टाकले पाहिजे; आणि जर नसेल, तर त्याला उपचारांची गरज आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) विद्यापीठ आणि 5 लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा विचार करणे, हे कल्पनेच्याही पलीकडचे आहे! पर्यावरणाची नासधूस करण्याचा हा कसला अट्टाहास आहे? आपल्या पृथ्वीबद्दल हा कसला द्वेष आहे? आम्हा मुंबईकरांना हे अजिबात नकोय. आमच्या जंगलांना हात लावू नका आणि आमचे शहर उद्ध्वस्त करू नका; असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

आर डी झा असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून ते दक्षिण मुंबईतील एका कॉलेजमध्ये फिजिक्स विषयाचे माजी प्राध्यापक आहेत असे सांगण्यात येत आहे. जानेवारी 2025 मध्ये झा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करावे, तसेच त्यात एक जागतिक दर्जाची भारतरत्न अटल बिहारी विद्यापीठ देखील स्थापन करावे अशी मागणी केली होती.