भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्याची आशा सोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघात पुनरागमनाची दारे आपल्यासाठी उघडी राहतील, असे भुवनेश्वर कुमारला काही काळ वाटत होते. मात्र, ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीकडून मिळालेल्या संकेतांनी अखेर त्यालाही वास्तव स्वीकारावे लागले. त्यामुळे आता आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळत नाही, असे भुवनेश्वरने स्पष्ट केले.

नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अखेरचा सामना खेळल्यानंतर भुवनेश्वर टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या दोन आयपीएल हंगामांत मात्र त्याने आपल्या गोलंदाजीची धार पुन्हा दाखवून दिली. तरीही हिंदुस्थानी संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले नाहीत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वरने मात्र स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपल्याला हिंदुस्थानी संघात स्थान मिळण्याचा अधिकार आहे; पण तो कुणाला काही सिद्ध करण्यासाठी क्रिकेट खेळत नाही. नक्कीच मला पुन्हा देशासाठी खेळायला आवडेल. मात्र, आता मी कोणाला काही सिद्ध करण्यासाठी खेळत नाही,’ असे त्याने सांगितले.

यावेळी भुवनेश्वरने मनातील खंतही उघड केली. ‘एकेकाळी मी पुढच्या मालिकेची वाट पाहत होतो. आता तो काळ मागे पडला आहे,’ असे तो म्हणाला. न्यूझीलंड दौऱ्यानंतर आपले पुनरागमन होईल, असा विश्वास का वाटला, याचा खुलासाही भुवनेश्वरने केला. निवड समितीकडून त्याला काही संकेत मिळाले होते. त्यामुळे पुढील दोन मालिकांमध्ये आपल्याला संधी मिळेल, असे त्याला वाटले. मात्र, नंतर परिस्थिती वेगळी असल्याचे त्याच्या लक्षात आले.’ असे भुवनेश्वरने सांगितले.