
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राहुल गांधी तरुणाईशी थेट संवाद साधणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. एसएसपीएमएस कॉलेज मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राहुल गांधी विद्यार्थिनींशी शिक्षण, रोजगार, सुरक्षा, समान संधी आणि पेपरफुटी या प्रश्नांवर संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी आठ ते दहा हजारांची उपस्थिती अपेक्षित आहे.
राहुल गांधींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शहरातील प्रमुख भागांत लावलेल्या बॅनरचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेस–एबीव्हीपीचे कार्यकर्ते भिडले
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात सीओईपी महाविद्यालयात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तरुणांना धमकावून राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, अशी धमकी दिल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने दाखल झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.



























































