
कल्याणमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांत राडा होऊन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करून सात आरोपींची धिंड काढली.
प्रेम सिंग कारने जात असताना सुदर्शन निकाळे याने कट मारली. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र पूर्वीपासून असलेल्या वैमनस्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. यानंतर रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील आत्मारामनगर येथील तुलसा पार्क इमारतीसमोर दोन्ही गट आमनेसामने आले.
शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी लाथाबुक्क्या आणि मारहाण सुरू असताना प्रेम सिंग याचा साथीदार ज्ञानेश्वर राठोड याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



























































