NEET-UG 2026 फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांसाठी मोठे बदल; 15 मिनिटे वाढवली, रफ वर्कसाठी अधिक पाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने NEET (UG) 2026 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. 21 जून रोजी होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर वातावरण मिळावे, तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक विद्यार्थी-केंद्रित व्हावी यासाठी हे बदल करण्यात आल्याचे एनटीएने म्हटले आहे.

एनटीएने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, परीक्षेचा एकूण कालावधी 180 मिनिटांवरून आता 195 मिनिटांचा करण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार आहे. उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी करणे, तपासणी आणि इतर अनिवार्य प्रशासकीय प्रक्रिया यासाठी लागणारा वेळ या अतिरिक्त कालावधीत समाविष्ट करण्यात आला आहे.

एनटीएच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मिळणारा प्रत्यक्ष वेळ प्रशासकीय प्रक्रियांमुळे कमी होत असल्याची भावना निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळेचा अधिक प्रभावीपणे उपयोग करता येणार आहे.

रफ वर्कसाठी दुप्पट पाने
परीक्षेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे रफ वर्कसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पानांची संख्या वाढविणे. यापूर्वी प्रश्नपत्रिका पुस्तिकेमध्ये केवळ दोन रफ वर्क पाने दिली जात होती. आता ती संख्या वाढवून चार करण्यात आली आहे.

गणिती मांडणी, आकृत्या काढणे किंवा इतर आवश्यक रफ काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक जागा मिळावी, या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे एनटीएने सांगितले आहे.

डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

रफ वर्क पानांच्या मांडणीतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सर्व रफ वर्क पाने प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली जात होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी, विशेषतः डावखुऱ्या विद्यार्थ्यांनी, ही रचना गैरसोयीची असल्याची तक्रार केली होती.

या पार्श्वभूमीवर आता दोन रफ वर्क पाने सूचनेच्या पानानंतर सुरुवातीलाच दिली जाणार आहेत, तर उर्वरित दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या शेवटी असतील. हा बदल इंग्रजीसह सर्व प्रादेशिक भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये लागू करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा अनुभव सुधारण्यावर भर

उच्च स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अगदी लहान सुधारणा देखील विद्यार्थ्यांच्या अनुभवावर सकारात्मक परिणाम करू शकतात, असे एनटीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे. परीक्षा प्रक्रियेला अधिक विद्यार्थी-अनुकूल बनवतानाच पारदर्शकता, निष्पक्षता आणि सुरक्षेची सर्वोच्च मानके कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.